पंढरपूर प्रतिनिधी
“मानवी कल्याणासाठी शास्त्रज्ञ नवनव्या घटकांचा शोध लावत असतात. या शोधातून निर्माण झालेले घटक कांही काळ उपयोगी ठरले तरी कालांतराने सदर घटकाचे दुष्परिणाम पुढे येतात. असे कालबाह्य ठरलेले घटक पर्यावरणात प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होते. ही बाब लक्षात आल्याने संशोधक बहुउपयोगी व कमी दुष्परिणाम होतील असे घटक शोधत आहेत. त्यात त्यांना यश मिळत आहे. या शोधातूनच स्मार्ट मटेरियल ही संकल्पना पुढे आली असून शाश्वत विकासासाठी ही बाब स्वागतार्य आहे. संशोधनातून पुढे येणारे शोध हे नवीन शोधासाठी उपयुक्त ठरत असतात.” असे प्रतिपादन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे माजी संचालक तथा माजी कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान कॉम्पोनंट ८ अंर्तगत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट मटेरियल्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल अप्लीकेशन्स’ या विषयावरील ’दोन दिवसीय आंतर्राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरू डॉ. शिवाजी पवार हे होते. यावेळी मंचावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी सुरतचे डॉ. निशांत देशपांडे, प्रा. डॉ. सौ. साळुंखे, उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. माणिक साळुंखे पुढे म्हणाले की, “मानवाच्या शाश्वत विकासासाठी नॅनो सायन्स, नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करून क्षमताधिष्ठित पदार्थ व साधने तयार करणे हे शास्त्रज्ञांपुढील प्रमुख आव्हान आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती उर्जेची गरज लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी न्युक्लीअर फ्युजन सारख्या पद्धतीचाही वापर शास्त्रज्ञानी सुरु केलेला आहे. यातून येत्या दोन दशकात उर्जेची गरज शाश्वत स्वरुपात भागवली जाईल. देशातील वाढते प्रदूषण ही मोठी समस्या बनू पहात आहे.त्याच्या निराकरणासाठी करावयाचे उपाय हे आर्थिक गणित बिघडविणारे आहे. त्यामुळे विकसनशील राष्ट्रे यात पुढाकार घेत नाहीत.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी पवार म्हणाले की, “भारतीय संशोधन क्षेत्रात होत असलेले कार्य हे शाश्वत स्वरूपाचे होत असून भारतीय शास्त्रज्ञांना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होवू शकते. समस्याधिष्ठित संशोधन हे तात्कालिक स्वरूपाचे असते. भविष्यकालीन उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन संशोधकांनी कार्य केले पाहिजे. कोव्हीड १९ महामारीच्या निर्मुलनासाठी भारतीय शास्त्रज्ञानी केलेल्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. त्यामुळे भारतीय संशोधन हे शाश्वत विकासासाठी प्रयत्नरत आहे. असे म्हणण्यास वाव आहे.”
या परिषदेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य आप्पासाहेब पाटील यांनी करून दिला. या परिषदेसाठी देशाबाहेरील व देशाच्या विविध राज्यातील विद्यापीठातून अनेक अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक उपस्थित झाले आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा देसाई यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. योगेश पाठक यांनी मानले.