खेड प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेच्या वतीने निष्ठावंतांच्या एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिविराट समुदायाला संबोधित करताना शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षावर सातत्याने होत असलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
खेडमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई कदम यांच्या जामगे गावी उपस्थित राहून देवी कोटेश्वरी मानाईचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
खेड येथील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संबोधित करताना खोके आणि गद्दारी करून नव्हे तर खुद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवून आणल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
सगळीकडे तीच टेप आणि फक्त दोन मुद्यांवर टीका हेच रडगाणं आता राज्यभर ऐकायला मिळणार असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. माझा बाप चोरला असं सगळीकडे सांगत सुटता, मात्र आम्ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा नव्हे तर विचारांचा वारसा पुढे घेऊन चाललो आहोत त्यामुळे त्यांचे विचार हेच आमची संपत्ती असून ती आमच्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अधोरेखित केले.
२०१९ साली आपण केलीत ती खरी गद्दारी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा दिवा आपल्या डोक्यात पेटवल्याने सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिलीत. दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घातलंत, हिंदुत्वाचा विचार सोडून दिलात, सावरकरांवर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलंत, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुमची जीभ कचरायला लागली त्यामुळेच हिंदुत्ववादी विचार जागे ठेवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहायचे, मात्र आपण कार्यकर्ता मोठा होतोय हे पाहून आनंदित झाला नाहीत. ज्या पक्षाचा कार्यकर्ता मोठा तो पक्ष मोठा, ज्या पक्षाचा कार्यकर्ता लहान तो पक्ष लहान ही साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही. त्यामुळेच आधी नारायण राणे मग राज ठाकरे आणि आता रामदास कदम यांना राजकारणातून संपवायला निघालात हे पक्षाचे मोठे दुर्दैव असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. अशीच भूमिका राहिली तर सगळे कार्यकर्ते निघून जातील फक्त 'हम दो हमारे दो' एवढेच तुमच्याकडे राहतील, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी बजावून सांगितले.
आमदार योगेश कदम हा खेडवासीयांसाठी प्रामाणिकपणे काम करत असून त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, त्यामुळे कितीही आले तरीही त्याला कुणीही पराभूत करू शकणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले.
कोकणात सभा आहे म्हणून फक्त आगपाखड करायला आलो नाही असे सांगत कोकणवासीयांसाठी काही घोषणा केल्या. कोकणचे पाणी अडवून कोयनेत सोडण्याच्या खेड कोयना प्रकल्पासाठी २४३ कोटी रुपये मंजूर केल्याचे याप्रसंगी सांगितले. तसेच कोकणातील लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यासमयी दिली. खेड नळपाणी योजना ४५ कोटी, क्रीडा संकुल २० कोटी, मरीन पार्क अशा अनेक विकासकामांना मंजुरी दिली जाईल असे यावेळी बोलताना नमूद केले. कोकणात येणाऱ्या वादळांमुळे नादुरुस्त होणाऱ्या विजेचे खांब दुरुस्त करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
डिसेंबरपर्यंत मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच कोकणात समृद्धी महामार्गाप्रमाणे ग्रिनफिल्ड महामार्ग तर किनारी भागांना जोडणारा कोस्टल महामार्ग तयार करण्यात असल्याचे देखील जाहीर केले. कोकणातील आंबा आणि काजू पिकांवर प्रकिया करणारा उद्योग सुरू करण्यावर नक्की भर देण्यात येईल तसेच मंडणगड येथे नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत नक्की सकारात्मक विचार करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम, ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरतशेठ गोगावले, मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेना राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना उपनेत्या.शीतल म्हात्रे, शिवसेना महिला संघटक सौ.मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, शिवसेनेचे कोकणातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाखो शिवसैनिक व कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.