अकलूज प्रतिनिधी
विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या सत्रात एसटी संदर्भात मुद्दा उपस्थित केला. सर्वप्रथम राज्यातील महिला भगिनींना एस टी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याबद्दल राज्य सरकारचे आ . रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले.
यावेळी आ. रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले,राज्यात दररोज जवळपास ७२०० बसेस मुक्कामी असतात. मुक्कामी वाहक आणि चालकांना गावाच्या ठिकाणी ७५ रु., तालुक्याच्या ठिकाणी ८०रु. तर शहरात मुक्कामी असल्यास रू. १०० एवढा नाममात्र भत्ता मिळतो. हा वाढवून देण्यात येणार का? हे कर्मचारी रात्री मुक्कामी राहतात तिथे त्यांची गैरसोय होते, त्यांना स्वच्छ मुक्कामाचे ठिकाण आणि स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी काय सुधारणा करण्यात येणार आहे? आणि एस टी स्थानकांची सुधारणा करण्यासाठी बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर देण्याबाबत काही विचार आहे असे 3 नेमके प्रश्न उपस्थित केले.
यावर मा.मंत्री महोदयांनी सविस्तर खुलासा केला. मान्यताप्राप्त संघटनांशी राज्य परिवहन महामंडळ चर्चा करून भत्त्यात वाढ करणार आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या रहिवासी सुविधा देखील अद्यावत करण्याच्या सूचना तात्काळ दिल्या जातील. परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी काही बसस्थानके बीओटी तत्वावर देण्याचे प्रस्ताव तयार होत असून त्यावर लवकरच निर्णय होऊन अंमलबजावणी होईल.असे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.