पंढरपूर प्रतिनिधी
“चिमणी हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. ती जगली पाहिजे. चिमणीमुळे पिकांवरील हानिकारक कीटक नष्ट करण्याला मदत होते. चिमणी हा जैव साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत होईल. सध्या माणसांची जीवनशैली बदलली आहे. झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे पक्षांचा निवारा नष्ट होत आहे. कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्याचा दुष्परिणाम पक्षांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे पक्षांसाठी चारा पाणी यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी चिमणी या घटकाकडे महत्त्व देणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत त्यांच्या हस्ते विद्यार्थ्याना मातीपासून बनविलेल्या कृत्रिम घरट्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. “ ही घरटी विद्यार्थ्यांनी योग्य ठिकाणी ठेवून पक्ष्यांचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करावे. पक्षांबद्दल व इतर प्राण्यांबद्दल आपल्यामध्ये प्रेम जागृत ठेवावे.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यशाळेतील प्रथम सत्रामध्ये चिमणी या पक्षाविषयीची शास्त्रीय माहिती अकलूज येथील पक्षी अभ्यासक प्राचार्य. डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली. या कार्यशाळेतील द्वितीय सत्रात चिमणी या पक्षावरील लघुपट मुलांना दाखवण्यात आला. या लघुपटाच्या माध्यमातून चिमणी पक्षातील प्रजाती, त्यांचे खाद्य,त्यांचा अधिवास, त्यांचा विणीचा हंगाम, त्यांची घरटी तयार करण्याची पद्धती व शहरीकरणामुळे व कॉन्क्रीटच्या जंगलामुळे चिमणीवर होणाऱ्या विपरीत परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याच सत्रामध्ये पक्षी अभ्यासक डॉ. विधीन कांबळे यांनी चिमणीच्या घरटी बनविण्याच्या पद्धतीचे सादरीकरण केले. त्यांनी या क्षेत्रात केलेले अनेक प्रयोग विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यशाळेतील तृतीय सत्रात विद्यार्थ्यांना ऑस्कर विजेती शॉर्ट फिल्म द एलेफंट व्हीसपरर दाखविण्यात आली.
यावेळी सोलापूर येथील डॉ. सौ. रंजना दवले यांनी मानव व प्राणी यांच्यातील सहजीवनाचा अविष्कार विद्यार्थांसमोर मांडला व विद्यार्थ्यांना बोलत केल.या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग व कर्मवीर निसर्ग मंडळाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमर कांबळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. सचिन थिटे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. अमोल ममलयया, डॉ. नवनाथ पिसे, प्रा. प्रदीप गायकवाड, प्रा. सचिन सोनकांबळे प्रा. अक्षय माने, प्रा. कु. श्वेता तेली, प्रा. दिव्या गायकवाड, प्रा. कविता कुलकर्णी, श्री. योगेश पाठक, डॉ. चंद्रकांत काळे यांनी परिश्रम घेतले.