मारापुर प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य मेळाव्यामध्ये आज यशोदा महिला पतसंस्थेचे चेअरमन नीलाताई आटकळे बोलत होत्या. त्यांनी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी उपलब्ध असल्याचे सांगून योग्य ती मदत करणार असल्याचे जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या मध्ये वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांनी महिला सक्षम असली पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे नमूद केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ.रोहिणीताई यादव यांनी लघु उद्योगाच्या,छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील महिलांनी मदत करणार असल्याचे सांगितले.त्यासाठी आपण कायम तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज टीव्ही व मोबाईलच्या जमान्यातही पारंपारिक अशा उखाणा स्पर्धेला महिलांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला . त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा,संगीत खुर्ची,रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व विजेत्यांना मारापुर ग्रामपंचायत वतीने पैठणी साडी भेट देण्यात आली. या परिसरातील महिलांना शरदचंद्र कृषी विद्यालयाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले व ग्रामीण भागातील महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतला.त्याबद्दल त्यांचे सर्व महिला वर्गाच्या वतीने कौतुक करण्यात येत होते.
सदर पद्धतीचा असा आगळावेगळा महिला मेळावा या परिसरामध्ये पहिल्यांदाच अनुभवत असल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना सहभाग घेता आला.त्यासाठी मारापुर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व शरदचंद्र कृषी विद्यालयाचे अध्यक्ष विनायक यादव यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचे नियोजन केले होते. त्यांना अशोक आसबे,बाळासाहेब यादव, राजकुमार यादव,अमोल जानकर,दासू वाघमारे, अशोक यादव,नाथा माने,चैतन्य सातपुते व इतर सर्व युवकांचे सहकार्य लाभले .सदर कार्यक्रमाचे आभार उपसरपंच सौ. सुवर्णा आसबे यांनी मानले