नरखेड प्रतिनिधी
आईच्या नावावरील ६ एकर शेत माझ्या नावावर खरेदी करून न देण्याकरता तुम्हीच दोघे नवरा बायको जबाबदार आहात. आज मी तुमचा फैसलाच करतो. तुमचा वंशजच ठेवत नाही. असे भाऊ आणि भावजयीस धमकावत भावानेच सख्या भावाच्या चार वर्षाच्या मुलीला जिवे ठार मारून मुलीचा मृतदेह मलिकपेठ येथील पुलावरून सिना नदीच्या पत्रात टाकून दिल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास मोहोळ तालुक्यात घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे रा.डिकसळ ता. मोहोळ वय ४ वर्ष असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण मोहोळ तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशोधन शिवाजी धावणे (वय ३५ रा. डिकसळ ता. मोहोळ) यांचे कुटुंबाची गावाच्या कडेस एकूण १६ एकर जमीन आहे. त्यापैकी यशोधन धावणे यांच्या नावे ५ एकर व भाऊ यशोदिप ठाणे याचे नावावर ५ एकर व राहिलेली सहायक तसेच जमीन ही आईच्या नावावर आहे. परंतु आईच्या नावावर असलेली सहा एकर जमीन पूर्णपणे यशोदीप च्या नावावर करावी यासाठी यशोदीप हा घरातील सर्व लोकांना त्रास देत होता. यावर गावातील प्रतिष्ठित लोकांनी व नातेवाईकांनी वेळोवेळी बैठक बसवून त्यास आई-वडील असेपर्यंत त्यांचे नावावर राहू दे नंतर ते सहा एकर तुम्हाला दोघा भावांचेच नावावर होणार आहे. व आम्ही करून देऊ असे जाणकार व पंचायतीचे लोकांनी यशोदीप यास वेळोवेळी समजावून सांगितले होते. परंतु तो सर्वांवर चिडूनच होता.
सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी सातच्या सुमारास यशोधन उठल्यानंतर भाऊ यशोदीप हा यशोधनशी शेत वाटणीच्या कारणावरून तक्रार करू लागला. त्यावेळी भाऊ यशोधन व भावजय हे दोघेही त्यास समजावून सांगत होते. परंतु यशोदिप काही ऐकत नव्हता. आईच्या नावावरील सहा एकर शेती माझे नावावर खरेदी करून देण्याकरिता तुम्हीच दोघे नवरा बायको जबाबदार आहात. असे म्हणत गोंधळ घालू लागला. गोंधळाचा आवाज ऐकून गोळा झालेल्या व्यक्ती यशोदीप ला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना यशोदीप यांनी भाऊ यशोधन व भावजय यास तुमचा फैसलाच करतो आज तुमचा वंशज ठेवत नाही. असे म्हणत शिवीगाळ करून गोंधळ घालत होता. त्यावेळी आलेल्या लोकांनी यशोदीप यास समजावून शांत केले.
त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास यशोधन, त्याची पत्नी योगिता व आई हे शेतातील काम करण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी यशोधनाची मुलगी ज्ञानदा ही झोपली होती. त्यानंतर शेतातील थोडेसे काम करून सकाळी आठ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास यशोधन घरी आले. त्यावेळी यशोधन यांना मुलगी ज्ञानदा घरात दिसली नाही. मुलगी घरात न दिसल्यामुळे सर्वत्र चौकशी केली. त्यानंतर आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास यशोधन यांनी भाऊ यशोदीप ला फोन लावून तू मुलीला पहिला आहेस का ? असे विचारले असता यशोदीप यांनी सांगितले की, मी तुझ्या मुलीला घेऊन येऊन मलिकपेठ येथील सिना नदीपात्रात पाण्यात टाकून दिलं आहे. त्यानंतर यशोधन हे हंबरडा फोडून रडू लागले. त्याचवेळी संभाजी सुर्यभान धावणे यांनी सांगितले की, अरे यशोदीप हा तुझी मुलगी ज्ञानदा हिला त्याचे मोटरसायकलचे पेट्रोल टाकीवर झोपलेल्या स्थितीत सकाळी ७ वाजून ५५ मिनिटाचे सुमारास नरखेड कडे घेऊन जाताना मला दिसला होता. असे सांगितल्याने यशोधन लगेच मोटरसायकल वरुन मलिकपेठच्या नदीचे पुलावर गेले. पुलावरून नदीत पाहिले असता मुलगी ज्ञानादा ही पुलाच्या पूर्वेस पाण्यावर तरंगत असलेली दिसली. असे यशोधन शिवाजी धावणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यशोदीप शिवाजी धावणे यांचेवर गुरनं १५४/२०२३ भादवि कलम ३०२, २०१, प्रमाणे मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने सदर घटनेचा पुढील तपास श्रेणी राठोड हे करीत आहेत.