भाषा समृद्ध करण्यासाठी संत तुकाराम, साने गुरुजीं यांचे वाङ्मय वाचन करणे गरजेचे - अरण्यऋर्षी मारुती चित्तमपल्ली
सोलापूर प्रतिनिधी
आयुष्यभर केलेली जंगल भटकंती त्यातून करण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण लेखनाच्या माध्यमातून मराठी भाषेत लाखभर नवीन शब्दांची जोड देत भाषा समृद्धीसाठी महत्त्वाचे योगदान दिले . विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात साध्या सोप्या भाषेतील साने गुरुजींची पुस्तके वाचली पाहिजेत . चौफेर वाचन करीत मराठी भाषेच्या समृद्धीची उंची कायम सर्वोच्च स्थानी ठेवणे शक्य आहे. असे प्रतिपादन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थीनींनी अरण्यऋषीशी संवाद साधत मुलाखतीच्या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटीतील चितमपल्ली यांच्या निवासस्थान नजिकच्या बागेत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुख्याध्यापिका गीता सादूल, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले , हरिप्रसाद बंडी , छाया गंडी , उमा कोटा आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी अन् मराठमोळ्या वेषातील अरण्य ऋषींची सनईच्या सुरात परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोसायटीतील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर गुलाब पुष्पवर्षाव केला . शिक्षकांच्या वतीने त्यांचे औक्षण करून भावी आयुष्यासाठी अभिष्टचिंतन करण्यात आले . तेलुगू भाषिक असूनही अरण्यऋषींनी लाखो नव्या शब्दांची भर टाकत मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले . मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत त्यांच्या नवशब्दांच्या निर्मितीचे रहस्य, त्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम, जीवनप्रवास ,जंगल भटकंती याची माहिती विद्यार्थिनींना व्हावी या उद्देशाने त्यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापिका गीता सादूल यांनी प्रास्ताविकेतून सांगितले. प्रशांत देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली तर माजी विद्यार्थीनी नयना मैले हिने पेन्सिलने अरण्यऋर्षीचे कृष्णधवल चित्र रेखाटून त्यांना भेट दिले .
विद्यार्थीनी आणि शिक्षकांच्या वतीने विचारण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांतून जंगल भटकंती आणि विविध विषयांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून मराठी भाषा आणि जीवन समृद्ध झाल्याचे सांगताना अनेक घटना आणि प्रसंगातून उकल करून सांगितले . संवादातून मुलाखत अधिक रंगतदार झाली . निरोगी आरोग्याचे गमक सांगताना, शाकाहारी ,निर्व्यसनी, हजारो मैल जंगलात पायी चालत भटकंती केल्याने ९४ व्या वर्षी आरोग्य टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. जंगल भ्रमंतीत पक्षी-प्राण्यांचा वावर माझ्याभोवती होता पण कधीही हल्ला झाला नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. झाडांना मिठी मारल्याने आजार कमी होतो, माणसांपेक्षा पशु-प्राण्यांत अधिक प्रेम असते. माणसांना भिती घालण्यासाठी घुबड हा वाघाचा आवाज काढतो,कोळीणला कोळी कीटक घाबरतो,कौटिल्याच्या नियमात उसाला दंड आहे, अशी निसर्गातील नवलाई मनोरंजनात्मक पद्धतीने सांगितले.
मुख्याध्यापिका सौ.गीता सादूल यांनी प्रास्ताविक केले,श्री.प्रशांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर दशरथ वडतीले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सर्वश्री संजय जोगीपेठकर, राघवेंद्र गजेली,विजयकुमार निरोळे, प्रसाद काळे,काशिनाथ बिराजदार,विलास नामा,डॉ.संजय गोविंदे, सिद्धेश्वर श्रीगादी, शिवानंद आळगुंडगी सूरज बिराजदार,श्रीनिवास,भुजंग चितमपल्ली,आदी उपस्थित होते.