पंढरपूर प्रतिनिधी
खेडभाळवणी ता.पंढरपूर येथील वाहन मालकास ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून टोळी न देता त्यांच्याकडून रु.6 लाख घेवून फसवणुक केल्याप्रकरणी टोळी मुकादमा विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पाठपुरावा केला होता.
पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी येथील शेतकरी बाबासाहेब महादेव करपे-देशमुख यांनी सहकार शिरोमणी साखर कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीसाठी गळीत हंगाम 2022-2023 मध्ये रितसर करार केलेला होता. त्या अनुषंगाने श्री.देशमुख यांनी टोळी मुकादम करमसिंग मोग्या वसावे रा.ओलपाडा,ता.अक्कलकोवा जि.नंदुरबार यांना 24 कामगार पुरविण्यासाठी रक्कम रु.6 लाख उचल दिलेली होती. कारखाना गळीत हंगाम सुरु झाला परंतू टोळी का आली नाही अशी वारंवार मुकादम यांना विचारणा केली असता टोलवा टोलवीची उत्तरे देवू लागला. मात्र गळीत हंगाम संपत आला तरी कामगारांचा पुरवठा केला नाही.
त्यामुळे शेतकरी बाबासाहेब महादेव करपे यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झालेले असून त्यांची टोळी मुकादम यांचेकडून फसवणुक झालेली आहे. आशा फसवणुक करणारे टोळी मुकादम योग्य ती कायदेशिर कारवाई करावी. तसेच ज्या वाहन मालकाची टोळी न आल्यामुळे फसवणुक झालेली आहे. अशा वाहन मालकांनी कारखान्याचे शेती विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करणेत यावी. जेणेकरुन संबंधित टोळी मुकादमावर योग्य ती कायदेशिर कारवाई करणे सोईचे होईल. त्याकरीता कायदेशिर कारवाई करणेकामी योग्य ते सहकार्य कारखान्यामार्फत करण्यात येणार असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2022-2023 मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचे गाळप सुरु आहे. मात्र गाळप हंगामात बऱ्याच वाहतुकदारांच्या टोळ्या हजर झालेल्या नाहीत. ऊस वाहतुकदारांकडून लाखों रुपयांचे उचल ऊस टोळी मुकादमांनी घेतलेली आहे. मात्र ॲडव्हान्स घेवुनही टोळी कामावर हजर न केल्यामुळे अनेक वाहनमालकांची फसवणुक झाली असून टोळी मुकादम यांचेवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन शेतकऱ्यांना न्याय मिळावा आशा आशयाचे निवेदन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पंढरपूर तालुका पोलिस निरिक्षक धनंजय जाधव यांचेकडे दिले.
यावेळी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक, अर्जुन जाधव, कामगार प्रतिनिधी बंडू पवार,कृष्णा जगदाळे, शेतकरी महादेव करपे उपस्थित होते.