पंढरपूर प्रतिनिधी
अनिष्ट रूढी आणि परंपराकडे समाज वाहू लागला असून त्याचा वाईट परिणाम सध्या समाजावर होताना दिसून येत आहे. या सर्व गोष्टी थांबून संस्कारक्षम समाज घडवण्यासाठी संत विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. असे प्रतिपादन ह. भ. प. सुनंदाताई भोस यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील राजे शिवाजी चौक मित्र मंडळ संचलित शिवनेरी ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सवातील शिवकीर्तनाप्रसंगी ह भ प. सुनंदाताई भोस या किर्तन सेवा बजावत होत्या.
या कीर्तनाप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सगुणा शेडगे, संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस, ह भ प विश्वंभर महाराज कदम यांच्यासह गावातील भजनी मंडळी उपस्थित होते.
पुढे कीर्तन सेवा बजावताना भोस म्हणाल्या की, चांगल्या समाज निर्मितीसाठी प्रबोधनाची गरज असून या प्रबोधन चळवळीसाठी प्रत्येक विचारशील व्यक्ती आपले योगदान दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणीच समाजाला तारू शकते. त्यामुळे समाजातील प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ यांचे तर तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासून शिवविचारांचा अंगीकार केला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.
अशी कीर्तन सेवा यशस्वी करण्यासाठी गावातील भजनी मंडळ, शिवजन्मोत्सवाचे सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या कीर्तनापासून रोपळे सह पंचक्रोशीतून महिला व पुरुष श्रोते उपस्थित होते.