सोलापूर प्रतिनिधी
अन्याय विरुद्ध धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे दै.महानगरी टाईम्सचे झुंजार पत्रकार शशिकांत वारिशे यांची भ्याड हत्या करण्यात आली असून या हत्येचा दै. तुफान क्रांती व साप्ता. कार्यसम्राटच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत.
झुंजार पत्रकार शशिकांत वारिशे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत होते. त्याचबरोबर रिफायनरी संदर्भात आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवत होते. त्यांची शेवटची बातमी दि.06 फेब्रुवारी 2023 च्या दै. महानगरी टाईम्स मध्ये प्रसिद्धी झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो असल्याचे ती बातमी होती.
तो संशयित आरोपी म्हणजेच रिफायनरी प्रस्थापित होऊ शकणार्या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर असल्याचे माहिती मिळत असून याच आंबेरकरने सोमवार दि. 06 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर पत्रकार शशिकांत वारिशे यांना पाहिले व बेसावध असलेल्या पत्रकार वारिशे यांच्या दुचाकीवर आपले चारचाकी वाहन घालून पत्रकार वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप आंबेरकर यांच्यावर असून पत्रकार वारिशे यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे आणण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते.
या जीवघेण्या हल्यात पत्रकार शशिकांत वारिशे बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आलेच नाही. सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत माळवली. पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निघृण हल्ला आहे. अशा प्रकारे दिवसा ढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक असून लोकशाहीला मारक आहे. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निधनाने वारिशे कुटुंबावर फार मोठी शोककळा पसरली असून घरचा करता पुरुष गेल्याने वारिशे कुटुंबियांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
तरी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून दिवंगत पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी पत्रकार संतोष म्हेत्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.