स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आदिका खरात यांनी केले उत्तम मार्गदर्शन
पंढरपूर प्रतिनिधी
सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही तर तो जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशात दि.११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत 'रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा' केला जातो. यंदा केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी 'रस्ता सुरक्षा सप्ताहा' चे आयोजन केले असून काल गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व वाहतूक शाखेच्या इतर अधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वेरीमध्ये ‘३४ वा रस्ते सुरक्षा सप्ताह’ मार्गदर्शन संपन्न झाला. यामध्ये सोलापूर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविकात प्रा.यशपाल खेडकर यांनी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर स्वेरी अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक मोटार व्हेईकल निरीक्षक म्हणून सोलापूर विभागात रुजू झालेल्या आदिका खरात यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘रस्त्यावरून चालत जाताना अथवा टू व्हीलर, थ्री व्हीलर व फोर व्हीलर वाहन चालविताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी?’ याबाबत सखोल माहिती दिली. वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक मयूर जाधव यांनी महाराष्ट्रात असणाऱ्या वेगवेगळ्या वाहनांचे चांगले सेफ्टी रेटिंग असून सुद्धा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्यामुळे कशा प्रकारे अपघात होऊ शकतो? याचे व्हिडीओच्या माध्यमातून सादरीकरण केले. तसेच ज्या ठिकाणी फुटपाथ नाहीत अथवा पादचाऱ्यांकरीता रस्ता नाही अशा वेळी पायी चालताना कोणत्या दिशेने चालावे व कोणकोणती काळजी घ्यावी? याबद्दल विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले तसेच वाहन चालविताना हेल्मेट का वापरावे व त्याचा कसा वापर करावा? याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहनचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक महेश रायभान म्हणाले की, ‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपली गती वाढली असून आपणच आपल्या वाहनांची गती नियंत्रणात राखणे गरजेचे आहे. कॉलेजला उशीर झाला, किंवा अन्य कारणाने आपण आपल्या वाहनाची गती नाहक वाढवितो आणि अपघाताला बळी पडतो. सीट बेल्ट लावल्यामुळे आपली सुरक्षा कशी वाढते, हे व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. पुढे त्यांनी प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा देखील स्पष्ठ केली. वाहकांना रस्ते वाहतूक संदर्भातील सर्व नियम माहित असणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने आखून दिलेले कायदे व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांकडून ‘मी वाहन सुरक्षित चालविणार’ अशी शपथ घेतली.
या कार्यक्रमांमध्ये स्वेरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता व एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी आभार आभार मानले.