ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले व संपुर्ण देशभरात कुंभमेळा भरणार्या चार तीर्थापैकी एक असणारे सर्वोच्च व सुप्रसिध्द असणाऱ्या श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर ला जोडणार्या व भाविकाचीं प्रचंड वर्दळ असणार्या घोटी आहुर्ली-म्हसुर्ली मार्गे श्रीक्षेत्र त्रंबकेश्वरच्या मध्यम-मार्गाची प्रचंड वाट लागली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष असुन ये-जा करणारे वाहनधारक, भाविक व परिसरातील नागरिक या बाबत तीव्र संताप व्यक्त करत आहे.
श्रीक्षेत्र त्रंबकेश्वरची अध्यात्मीक नगरी अशी भारतात सर्वदुर ओळख असुन या तीर्थाला भेटी देण्यासाठी सबंध भारतातुन भाविकाचीं सातत्याने वर्दळ असते. मात्र इतका महत्त्वाचा व सातत्यपुर्ण वर्दळीचा रस्ता असतानांही सा.बां.विभागाला मात्र या मध्यम-मार्गाचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
या रस्त्याला ठिक ठिकाणी प्रचंड मोठे जीवघेणे खड्डे पडलेले असुन यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघातही झाले आहेत.
प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देणार का ? खड्डे मुक्त महाराष्ट्र कधी होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन शिर्डी ते थेट श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर ला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रस्त्याची घोषणा खासदार हेंमत गोडसे यांनी केली आहे. या घोषणेला आता सहा महिने उलटुन गेले आहेत. अदयाप ही काम सुरु झाले नसुन, ते काम नेमके कधी सुरु होणार ? असे अनेक सवाल नागरिक करत आहेत.
शेवगेडांग जवळ रस्त्याला पडले मोठे खड्डे
घोटी ते त्रंबकेश्वर मार्गांवर शेवगेडांग परिसरात रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. यातुन परिसरात अपघात ही घडत असल्याची तक्रार सामाजीक कार्यकर्ते शरद उत्तेकर यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.
हया रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी उत्तेकर यांचेसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कैलास शिंदे , विश्राम पोरजे, संतोष भरीत , हिरामण भरीत जनार्दन भरीत आदींसह नागरिकांनी केली आहे.