विशेष लेख
संयुक्त राष्ट्रसंघ विकास अंतर्गत मानवी विकास निर्देशांक ( HDI) प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केला जातो. त्याच पद्धतीने देशाचा,राज्याचा, जिल्ह्यांचा, तालुक्यांचा, गावांचा ,वाडी वस्तीचा ही मानवी विकास निर्देशांक प्रसिद्ध होणे गरजेचे गरजेचे आहे.राजकीय स्टंटबाजी करायची असेल तर राजकीय व्यक्तींना मानवी विकास निर्देशांका बाबतीत बोलावे लागेल.स्वत:ला समाजसुधारक मानून राजकीय पक्षांची पुंगी वाजवणारे स्वयंघोषित समाजसुधारकांनी याबाबतीत बोलणे गरजेचे आहे.महापुरूषांच्या नावाने आदळ आपट करण्यापेक्षा त्यांच्या आचार विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला का याबाबतीत आदळ आपट केलेली बरी.आज घडीला देशाला व राज्याला त्याची गरज आहे.
आज पाहिले तर मानव विकास निर्देशांकात भारत 191 देशाच्या यादीत 132 व्या क्रमांकावर आहे.याचा विचार होणे गरजेचे आहे.भारताच्या शेजारचे छोटे छोटे देश ही मानवी विकास निर्देशांका बाबतीत भारताच्या वरच्या स्थानावर आहेत.
हीच बाब महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिली तर महाराष्ट्र पहिल्या काही क्रमांकात दिसत नाही.यामध्ये केरळ राज्य आघाडीवर दिसते. विकासाचा दांडोरा पिटणारे गुजरात ही वरच्या स्थानात दिसत नाही.
लोकांच्या मनात आता त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली जावू लागली आहे.सत्ताधारी असो या विरोधक असो त्यांनी राजकारण करत बसण्यापेक्षा माझा देश,माझे राज्य,माझा जिल्हा,माझा तालुका,माझा गाव, माझी वाडी,माझी वस्ती मानवी विकास निर्देशांकात कुठे आहे.हे सांगण्याचे धाडस करावे.
उठसुठ विकासाच्या नावाखाली टिकाटिप्पणी करून चालणार नाही.महापुरूषांच्या नावाखाली राजकीय षडयंत्रे रचण्या पेक्षा ,सीमा वाद उफाळून आणण्यापेक्षा माझा प्रदेश HDI च्या बाबतीत बुडाला का आहे..? यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे.
आज माझे सर्वच राजकीय पक्षांना आव्हान आहे.तुमची राजकीय भांडणे मानवी विकास निर्देशांका अशा विषयांवर झाली तर 2030 पर्यंत भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. 2047 या वर्षाची वाट पाहत बसण्याची गरज ही भासणार नाही.
ज्या विषयात लोकांना रसच नसतो असे विषय घेऊन लोकांचा विषय आहे म्हणून छाती बडविण्यापेक्षा माझा प्रदेश HDI बाबतीत मागे का..? यावर विचार विनिमय होणे काळाची गरज आहे. यावर लोकशाहीच्या चौथ्यात स्तंभानेही काम करणे गरजेचे आहे.
काळ बदलला आहे... त्याप्रमाणे राजकीय लोकांनी स्वतः च्या सुपिक डोक्यातून सुपीक योजना राबवून आरोग्य, शिक्षण, आर्थिक विषमता, दारिद्र्य, लिंग असमानता, विज, पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधा, स्त्रियांचा समाजातील दर्जा, सुरक्षितता, भयमुक्त वातावरण,लोकांचे राहणीमान उंचावणे या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली पाहिजे.
राजकीय भूमिका घेऊन जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरता तेव्हा रस्ता रोको आंदोलन करता, सरकारी वाहनाचे नुकसान करता , तेव्हा थोडी जनाची नाही तर मनाची थोडी लाज तुम्हाला वाटत नाही का...? तुम्ही राजकीय भूमिका रस्ता रोको आंदोलन, रस्त्यावर टायर पेटवून करता असे सामान्य लोकांना वेठीस धरणे तुम्हाला योग्य वाटते का..?
खरंच विकासासाठी ध्यास घेऊन तुम्ही काम करत असाल तर तुम्ही सत्ताधारी लोकांना सभागृहात घेरा .तिथे घेरले तरच प्रश्नांना योग्य असे समर्पक उत्तर मिळतील.जुनाट बुरसट विचारांना तिलांजली देऊन लोकांना तलवारी घेऊन लढाईत उतरायला सांगण्यापेक्षा लेखणी सारखे धारधार हत्यार चालवायला मदत करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः च्या बायकोचे अलंकार विकून बहुजनांची पोरं शिकून प्रस्थापित लोकांच्या छाताडावर थायथाय नाचावित यासाठी स्वतः ला झिजविले, महात्मा फुले दांपत्याने मुलींना शाश्वत शिक्षण मिळावे यासाठी शेण,चिखल , दगडांचा मारा सहन केला.
या महापुरुषांच्या आचारावर व विचारावर महाराष्ट्र व देश चालला असता तर देश व राज्य मानवी विकास निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे हे शोधण्याची वेळ आली नसती.
स्वतः ला प्रगल्भ राजकीय व्यक्ती समजणाऱ्या लोकांनी,चाटू मिडियाने , स्वतः थोर विचारवंत मानणाऱ्या लोकांनी, स्वतः ला थोर समाजसुधारक आहे असे छातीठोकपणे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी पहिले भारत 132 व्या क्रमांकावर का आहे याचे उत्तर द्यावे. महाराष्ट्रातील स्वतःला विकास पुरुष मानणाऱ्या माननीय माननीय लोकांनी महाराष्ट्र मानवी विकास निर्देशांकात कितव्या क्रमांकात आहे हे सांगून राजकीय फडात त्यांचे भांडवल करावे.बस तेवढीच सामान्य जनतेने आशा अपेक्षा आहे.
लोकांना सुखी,समाधानी व आनंदी पाहायचे असेल तर मानवी विकास निर्देशांक ( HDI ) सुधारण्यासाठी मायबाप सरकारने व विरोधकांनी यावर एकजुटीने काम उभे करावे.. उपेक्षित लोकांना अपेक्षित स्थानावर पोहोचवले तर नक्कीच महाराष्ट्राचे शिवाय देशाचे नंदनवन पाहायला वेळ लागणार नाही. शिवाय स्विझरलँड, नॉर्वे यांच्या रांगेत माझा देश आल्याशिवाय राहणार नाही.
लोकांची माथी भडकवून राजकारण करण्यापेक्षा लोकांची माथी शांत राहण्यासाठी शिक्षण,आरोग्य, दारिद्र्य, वीज ,पाणी, रस्ते, महिला सबलीकरण, सुरक्षितता, समानता या गोष्टीवर काम केलेले सर्वात बरे.
प्रा.आनंदा आलदर