सिंहगड अभियांत्रिकी मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम चे उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना देखील इतर शाखांचा देखील अभ्यास करणे आता शक्य झाले असून विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय ज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज आहे, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असून ज्या विद्यार्थ्यांना इतर ज्ञानशाखेत रस असल्यास तसे शिक्षण घेणे आता सोपे होणार आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथमवर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्रॅम च्या उद्धाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर दैनिक सकाळ चे निवासी संपादक अभय दिवानजी, सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य शैक्षणिक डॉ. आर. टी. व्यवहारे, उपप्राचार्य प्रशासन डॉ. एस. एम. जगदे प्रथमवर्षं विभागप्रमुख डॉ. विनोद खरात उपस्थित होते.
सकाळचे संपादक अभय दिवाणजी यांनी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण माणूस बनणे व मानवाच्या समस्या सोडवणे हे अभियंत्यांचे प्रमुख ध्येय असले पाहिजे, नेहमी सकारात्मक राहा असा सल्ला देखील दिला.अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना डोळसपणे समाजात वावरले पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी इंडक्शन प्रोग्रॅम चा उद्देश स्पष्ट केला.
सिंहगड चे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आचरण, करणे, नाविन्याचा ध्यास व कठोर मेहनतीचे महत्व विशद केले.
पुढे बोलताना डॉ. फडणवीस यांनी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्यावा असेही आवाहन केले.
यावेळी सुमारे ३००विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपप्राचार्य प्रशासन डॉ. एस. एम. जगदे यांनी केले तर सूत्रसंचालन ऋतुजा राऊत व सुझान नदाफ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी मंडळाचा सचिव चिन्मय झोड, नोमान शेख, प्रसाद कालदीप, कृष्णात कापसे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.