मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
नेरुळ ज्येष्ठ नागरिक संघ संस्थेच्या सार्वजनिक ग्रंथालयतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान दिन संघाच्या सभागृहात उत्साहाने साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर शं. पा. किंजवडेकर यांच्या प्रतिमा आणि संविधान ग्रंथाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. सौ. कमल आंगणे आणि रमेश गायकवाड यांनी सुरेल शारदा स्तवन सादर केल्यानंतर पी. आर. गुप्ता यांनी घटनेच्या उद्येशिकेचं वाचन केले. प्रमुख पाहुणे व संविधानाचे नामवंत अभ्यासक श्री. नागेशजी धोंडगे आणि जेष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सौ. शारदा शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.
या प्रसंगी बोलताना नागेशजींनी संविधान अर्थात भारतीय राज्यघटना निर्मितीची स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रक्रिया, राजकीय परिस्थिती, भारतातील स्वातंत्र्य चळवळी सोबत घडलेलं सामाजिक मंथन, तसेच अगदी नावांसहित व्यक्ती विशेष, सनावळी, तारखांनुसार स्थळ काळाची विस्तृत माहिती देत दुसर्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इंग्रजी राज्यसत्तेवर ओढवलेली अगतिकता आणि त्यामधून निर्माण झालेली घटना समिती स्थापन करण्यामागची इंग्रजी राजवटीची निकड, हा घटनाक्रम विषद करीत इंडियन नॅशनल काँग्रेस, मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, जगजीवन राम, अशा अनेक प्रभूतींच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घटना समितीमधील प्रवेश आणि तद्नंतर त्यांनी भूषविलेले अध्यक्ष पद याचे अभ्यासपूर्ण विवेचन करीत भारतीय नागरिकांमधे संविधान साक्षरतेची गरज अधोरेखित केली. घटनापीठ या सारखा नीरस क्लिष्ट विषय सोपा करुन, श्रोत्यांसमोर एक एक मुद्दा उलगडून सांगत व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृह ही उद्बोधक माहिती ऐकण्यात गुंगून तर गेलेच त्याचबरोबर प्रभावीतही झाले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांची आपल्या छोटेखानी भाषणात श्री. नागेशजी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचा गौरव केला तसेच व्यासपीठावर उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रेखाताई वाळवेकर उपस्थित होत्या.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सौ. शारदा शहा यांनी संविधान दिनाचे औचित्य विषद करीत महिलांचा सन्मान आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या आणि हक्क या संबंधी मौलिक मार्गदर्शन करताना विविध कायद्यांची महत्वपूर्ण माहिती देत सभागृहाला संविधानाचे विविध पैलू उलगडून सांगितले.
या कार्यक्रमाचे समयोचित सूत्रसंचालन ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष विकास साठे, तसेच प्रास्ताविक करताना घनश्याम परकाळे यांनी आत्तापर्यंतच्या ग्रंथालयाच्या प्रवासाचा आढावा घेतला. ग्रंथालय सचिव आणि या विशेष कार्यक्रमाच्या कर्ताधर्ता सौ. सीमा आगवणे यांनी सर्वांचे आभार मानीत उत्कृष्ट आभारप्रदर्शन केले. राज्यघटनेची 'प्रतिज्ञा' कुमारी उल्का सावंत हीने सादर करित, स्पष्ट उच्चार व बालसुलभ वक्तृत्वाचा ठसा उमटवला. छायाचित्रणाची जबाबदारी श्री. दत्ताराम आंब्रे तसेच व्हिडीओग्राफी करणारे रमेश गायकवाड यांनी सादर केलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वश्री प्रभाकरराव गुमास्ते, रणजीत दीक्षित, नंदलाल बॅनर्जी, विजय सावंत यांनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.