मुंबई प्रतिनिधी - पंकजकुमार पाटील
आर पी आय आठवले गट जोगेश्वरी गोरेगाव उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस जोगेश्वरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आर पी आय च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शीलाताई गांगुर्डे, आरपीआय नेते अनिल गांगुर्डे, आयोजक उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष रेश्मा खान, जोगेश्वरी तालुका अध्यक्ष फुलचंद कांबळे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक चंद्रशेखर सावंत, २००० साली काश्मीर येथे शहीद झालेले जोगेश्वरी येथील वीर जवान निलेश सावंत यांच्या वतीने त्यांचे पुतणे अभिजित सावंत, सामाजिक कार्यकर्त्या सुरक्षा घोसळकर यांचा एकुलता एक मुलगा स्वराज जो खडकवासला येथे सैनिकी प्रशिक्षण घेतोय व सामाजिक कार्यकर्ते-शिक्षक गणेश हिरवे अशा सर्वांचा या निमित्ताने संविधान प्रत देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनीना देखील संविधानाची प्रत भेट देण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले पण आज त्याचा सर्वांनाच विसर पडत चालला असून संविधानानुसार बहुतेक काहीच सुरळीत सुरू नसल्याचं दिसत आहे. राज्यघटनेच्या वर कोणीच नसून भारतीय लोकशाहीत राज्यघटनेला म्हणजेच संविधानाला खूप महत्व आहे असे प्रमुख पाहुण्या शिला गांगुर्डे म्हणाल्या.
उघड्या डोळ्यांनी समाजात होणारे अन्याय अत्याचार याविरुद्ध आपल्यालाच पुढे यावं लागेल व संविधानाने जे जे हक्क व अधिकार आपल्याला दिले आहेत त्याचा प्रत्येकाने उपयोग वापर करायलाच हवा असे मत सुरक्षा घोसाळकर यांनी नोंदविले तर संविधान महत्वाचे आहेच आणि २६/११ रोजी मुंबई वर झालेला दहशतवादी हल्ला व त्यात शहीद झालेल्या आपल्या पोलीस अधिकाऱ्यांचे शौर्य कोणालाही विसरता येणारे नाही. संविधान दिवस यापुढे अधिक मोठ्या उत्साहाने साजरा व्हायला हवा असून सर्वांनीच त्यात सहभागी व्हायला हवे.
या दिवसाचे महत्व जाणून याचा उल्लेख दिनदर्शिकेमध्ये असायला हवा व ज्या प्रमाणे राष्ट्रगीत आपण नेहमी म्हणतो त्याचप्रमाणे संविधानाचे वाचन प्रत्येक शैक्षणिक संस्थांमधून व प्रत्येकानेच ते करायला हवे असे गणेश हिरवे यांनी सांगितले. यावेळी गोरेगाव तालुका रीपाईच्या अनेक नवीन नियुक्त्या झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र रेश्मा खान व शीला गांगुर्डे यांच्या हस्ते देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरेगाव तालुका अध्यक्ष रमेश पाईकराव यांनी आपल्या पहाडी आवाजात केलं.कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती.शहीद जवानांना व पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.