सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचार्यांची दिवाळी त्यांना मिळणार्या बोनस मुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलिस विभाग अपवाद आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचार्यांना वेळप्रसंगी 18 ते 20 तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. प्रसंगावधान व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पोलिस कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावून जातात. सततचा बंदोबस्त, राजकीय नेत्यांचे सभा मेळावे बैठका बंदोबस्त, सण मिरवणुका, अशा उत्सवानिमित्त पोलिस नेहमीच बंदोबस्तात असतात. त्यांच्या कामाची वेळ ठरलेली नसते.
कोरोना काळात आपले कुटुंब बाजूला सारुन व जीव धोक्यात घालून राज्यातील पोलिस कर्मचार्यांनी अतिशय कौतुकास्पद काम केले असून कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कार्याचे कौतुक देखील झाले आहे. राज्य सरकार इतर शासकीय विभागातील कर्मचार्यांना दिवाळीला बोनस देते परंतु राज्यातील पोलिस कर्मचारी याला अपवाद आहेत. तरी मा मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून राज्यातील पोलिस कर्मचार्यांना एक महिन्याचा पगार (विना परतावा) दिवाळी भेट म्हणून देण्यात यावा व पोलिसांची दिवाळी गोड करावीअशी मागणी ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे