तब्बल पंचवीस वर्षांनी फुलली मैत्रीची मैफील ः हासू ,आसू आणि सुख दुखाच्या आठवणींना उजाळा ः सामाजिक भान जोपासण्याची ग्वाहि
पंढरपूर प्रतिनिधी
एकमेकांना भेटण्याची ओढ आणि मित्रांचे दुःख वाटुन घेत सुखद क्षणांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आसूसलेलं मन. आपण घडविलेल्या विद्यार्क्षीरूपी मुर्त्यांमध्ये जीवन जगण्यातलं देवपण आलं आहे का ? याचं परीक्षण करता करता विद्यार्थ्यांच्या यशोगाथेने धन्य पावलेले शिक्षक. तसेच हासू आणि आसुंची साक्ष असणार्या भावनांच्या ऋणानुबंधांनी बहरलेला मैत्रीचा रौप्यमहोत्सव मैत्रीतील गंध द्विगुणित करून गेला.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या 1996 -97 च्या इयता दहावीच्या बॅचचा तब्बल पंचवीस वर्षांनी मैत्रीचा रौप्यमहोत्सव हा स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी माजी शिक्षक माणिक चौधरी, जीवन रेपाळ, पोपट गव्हाणे, पुरूषोत्तम कुलकर्णी, पांडुरंग यादव, टरले, हरिश्यचंद्र कोरे, आर.एन. दहिटणकर, के.के भुजबळ, आर.जी.कावळे, बी.एस. गोडसे, दतात्रय कदम, एम.एम.तांबोळी, अंकुश भोसले, दिलीप कुंचेकर, सोमनाथ जगपात आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थान मुख्याध्यापक बिभिषण पाटील यांनी भुषविले.
शाळेतील मैञीपूर्ण आठवणींच्या ओंजळीतील पंचवीस वर्षे कधी निघून गेली कळच नाहि... पण 25 वर्षांनी का होईना भेटण्याची आतुरता मात्र तेवढीच होती... आज मात्र पाहता पाहता सगळेच जमले अनं मैञीचा वर्ग पुन्हा एकदा बहरला... मग काय एकमेकांची आतुरतेने केलेली विचारपूस , कौतुक अंन शाळेतील आठवणीहि... हा मैत्री सोहळा साकारला खरा, पण शिक्षक आणि मित्रांच्या भेटीने सर्वांचाच उर कधी भरून आला ते नयनातील आनंद अश्रुंनीच सांगितले .
यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षक व मान्यवरांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा आम्हाला अभिमान असून यापुढेही असेच एकजुटीने राहून मित्रांबरोबर समाजातील गरजूंनाही मदतीचा हात पुढे करावा व समाजाच्या प्रगतीचे पाईक झाले पाहिजे असे सांगितले.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी यांनी शाळा व शिक्षकांचे ऋण व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला. हा मैत्री मेळावा यशस्वी करण्यासाठी सन 1996-97 बॅचमधील मेळावा समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
स्वच्छता मशिन देवून दिला स्वच्छतेचा संदेश...
सन 1996-97 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी स्वच्छतेचे मशिन भेट दिले. या भेटीद्वारे त्यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरीकांना स्वच्छतेचा संदेशच दिला असल्याने या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे रोपळे परिसरातून कौतुक होत आहे.