(भाग-५)
२२ जून १८९७ चा दिवस. नागपुरातील एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मैदानावर एकत्र केले गेले होते. काय कार्यक्रम आहे याची सर्वांनाच उत्सुकता होती. मैदानावर जमलेली मुले एकमेकांना कार्यक्रमाबाबत विचारत होती, तेवढ्यात त्यांना कळले, की *आपल्या देशावर ज्या इंग्रजांचे राज्य आहे त्या इंग्रजांच्या इंग्लंडमधील राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यारोहणाला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत, याप्रित्यर्थ हा कार्यक्रम असून या आनंदाप्रित्यर्थ मुलांना खाऊ वाटप केला जाणार आहे.* खाऊ व मुले यांचे तसे जवळचे नाते. खाऊ मिळणार-मिठाई मिळणार म्हणून मुले खुश होती. कार्यक्रम संपला, मुलांना ओळीत उभे केले व प्रत्येक मुलाला मिठाई देण्यास सुरुवात केली. एक-एक मुलगा मिठाई घेऊन पुढे सरकत होता.*छोट्या केशवचा नंबर आला त्याने हातात मिठाई घेतली, दोन पावले पुढे सरकला व तेथील कचराकुंडीत ती मिठाई फेकून दिली व मोठ्याने म्हणाला, आपल्या देशाला गुलाम बनवणाऱ्या इंग्रजांच्या राणीच्या कार्यक्रमाची मिठाई मी खाणार नाही.* हा छोटा केशव अवघ्या *आठ वर्षांचा* होता. मिठाई मिळाली म्हणून इतर मुले आनंदात होती तर अवघ्या आठ वर्षांच्या केशवच्या मनात मात्र देशभक्तीचा भाव ओतप्रोत भरून वाहत होता. याच केशवने नागपुरातील किल्ल्यावरचा इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून तेथे भगवा झेंडा फडकवण्यासाठी आपल्या अभ्यासाच्या खोलीतून किल्ल्याकडे जाण्यासाठी *भुयार खोदण्याचा* प्रयत्न केला, परंतु त्यात त्याला यश आले नाही. वंदे मातरम म्हटले की इंग्रज चिडत हे पाहून आपल्या शाळेत आलेल्या *रिस्ले सर्क्युलर या पर्यवेक्षकाचे केशवने वंदे मातरम म्हणून स्वागत केले* व त्याचा परिणाम म्हणून त्याला शाळेतून काढण्यात आले.
बालवयापासूनच देशभक्तीचा भाव मनात बाळगून असणाऱ्या केशवने पुढच्या काळात *लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले.* कोलकत्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना *कोकेन* या टोपण नावाने क्रांतिकार्य केले, त्या बदल्यात त्यांना अटकही करण्यात आली. भूमिगत राजगुरूंची व्यवस्था करणे, क्रांतिकारकांना रसद पुरविणे या कामांमुळेदेखील त्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसच्या प्रत्येक कामामध्ये ते सक्रिय होते. १९२०च्या नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते *स्वयंसेवक दलाचे प्रमुख होते.* प्रांत काँग्रेसचे *संयुक्त कार्यवाह* म्हणून देखील त्यांनी काम केले. *असहकार आंदोलन, जंगल सत्याग्रह* अशा सर्व आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व प्रसंगी तुरुंगवासही भोगला.
एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सक्रियपणे काम करत असतानाच या देशाला *स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अखंडित ठेवण्यासाठी व या स्वराज्याचे सुराज्य बनविण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे* या हेतूने डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी *१९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली.* एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सक्रिय राहून डॉक्टरांनी संपूर्ण देशभर फिरून अवघ्या *१५ वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देशभर पसरवले.* त्यांच्या निधनाच्या समयाला १९४० साली अखंड भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये संघ काम जाऊन पोहोचले होते, यामागे डॉक्टरांचे अथक परिश्रम होते. *देशाच्या परमवैभवासाठी* झटणारी पिढी तयार करण्याचे कार्य डॉक्टरांनी केले.
संस्कार,शिस्त व देशभक्ती यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ओळखला जातो, अशा संघाचे संस्थापक असणाऱ्या डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यांच्या बालवयातच इतर मुलांप्रमाणे मिठाई खाण्याचा आनंद न घेता आपल्या मनातील जाज्वल्य देशभक्तीचं मिठाई फेकून प्रकटीकरण केलं म्हणूनच म्हणावेसे वाटते *डॉ.हेडगेवार यांना जीवन कळले होते.
- डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर