(भाग-४)
मोहनदास करमचंद गांधी यांनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यानंतर कस्तुरबांशी विवाह केला व *वकिलीची प्रॅक्टिस* करण्यासाठी भारतापासून दूर असणाऱ्या *दक्षिण आफ्रिकेची* निवड केली. उच्च शिक्षण घेतलेल्या कोणीही व्यक्तीप्रमाणेच परदेशात जाऊन व्यवसाय - नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मोहनदास यांनी देखील आफ्रिकेचा मार्ग धरला. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वसामान्यपणे आपण आणि आपला व्यवसाय असा विचार करून मोहनदास आपल्या पत्नीसोबत राहत होते. तेथील वातावरणात ते मिसळून गेले होते. परंतु *अपमानित करणाऱ्या एका प्रसंगाने* त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. तो प्रसंग देखील सर्वांना परिचित असाच आहे.
*प्रथम श्रेणीचे* तिकीट काढूनदेखील रेल्वेमध्ये त्यांना *तृतीय श्रेणीच्या* डब्यात बसून प्रवास करण्याचा आग्रह करण्यात आला, सक्ती करण्यात आली. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेवर देखील गोऱ्या इंग्रजांचे राज्य होते, त्यामुळे *प्रथम श्रेणीने केवळ गोरे इंग्रजच* प्रवास करू शकतात. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णिय व इंग्रजाच्या गुलामीत असणाऱ्या *भारतातील काळ्या लोकांनी मात्र तृतीय श्रेणीनेच* प्रवास करावा ही इंग्रजांची अपेक्षा होती. हा *वर्णद्वैषाचा* प्रकार होता. प्रथम श्रेणीच्या डब्यातून तृतीय श्रेणीच्या डब्यात जाण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर *त्यांचे सामान व त्यांनादेखील प्लॅटफॉर्मवर ढकलून देण्यात आले.* या प्रसंगाने मोहनदास प्रचंड बेचैन झाले व संतप्तदेखील झाले.
त्यांनी घरी आल्यानंतर आपल्या पत्नीशी चर्चा केली व त्यांच्या मनात असा विचार आला, की दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये एका भारतीयाला अशी अपमानाची वागणूक मिळत असेल तर माझ्या देशामध्ये गुलामीत असणाऱ्या माझ्या देशबांधवांना किती *अपमानाची व लाचारीची* वागणूक मिळत असेल? मी जे शिक्षण घेतले आहे, त्या *शिक्षणाचा माझ्या देशबांधवांसाठी उपयोग झाला पाहिजे, माझ्या देशातल्या लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले पाहिजे* यासाठी मी माझ्या स्वप्नांना दूर ठेवून भारतात जायला हवे. असा विचार करून मोहनदास आपल्या पत्नीसह *१९१५ साली* भारतात परतले.
*मोहनदास गांधी ते महात्मा गांधी* हा प्रवास आपणा सर्वांना परिचित असाच आहे. या देशातल्या *सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला* देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सिद्ध करण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. सामान्यतला सामान्य माणूस निर्भयपणे इंग्रजांच्या विरुद्ध कसा उभा राहील यासाठी त्यांनी *नाविन्यपूर्ण व अहिंसेच्या* तत्त्वावर आधारित आंदोलनांची योजना बनविली. त्यांनी स्वीकारलेल्या मार्गाबाबत कदाचित *दुमत* होऊ शकते, कदाचित हा मार्ग त्या काळात व आजच्या काळातदेखील पसंत नसणारे अनेक जण असू शकतील, तरीही महात्मा गांधी यांच्या कार्याचे महत्त्व कमी होऊ शकत नाही.
इंग्रजांच्याकडून अनेक-अनेकांना अनेक वेळा *अपमानाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले* तरी पण या अपमानातून *धडा घेऊन* या लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचा निर्धार केला नाही. परंतु रेल्वेतून प्रवास करताना झालेल्या अपमानामुळे मोहनदास गांधी यांनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याचा जो निर्धार केला हे पाहता खरोखरच *महात्मा गांधी यांना जीवन कळले होते* असेच म्हणावे लागेल.
- डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर