स्वेरीच्या डॉ.बी.पी.रोंगे सरांनी ग्रामीण भागातील उंबऱ्या-उंबऱ्यापर्यंत तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा पोहचवली- प्रवेश प्रक्रीया अधिष्ठाता प्रा.करण पाटील
पंढरपूर प्रतिनिधी
'स्वेरीच्या ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाशी ओळख होत असून सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अभियांत्रिकी तंत्रज्ञान या बाबींचे ज्ञान फारसे अवगत नसते. यासाठी त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहीती होऊन त्यात आवड निर्माण व्हावी. या हेतूने स्वेरी मध्ये ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या तंत्र-प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असताना स्वेरीच्या डॉ.बी.पी.रोंगे सरांनी ग्रामीण भागातील उंबऱ्या-उंबऱ्यापर्यंत तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा पोहचवली.’ असे प्रतिपादन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या विज्ञान व तंत्रज्ञाना बाबतीत १४, १५, व १६ सप्टेंबर रोजी तीन दिवसीय भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रदर्शन पाहण्यासाठी बाहेरून आलेल्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रा. पाटील बहुमोल मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर प्रा. संदिपराज साळुंखे यांनी स्वेरीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या पंचवीस वर्षातील, तांत्रिक, संशोधन, प्लेसमेंट आदी विभागात झालेल्या प्रगतीचा आलेख सादर केला. प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए.ए.मोटे यांनी ‘स्वेरीच्या प्लेसमेंटची वाटचाल सांगून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करण्यासाठी व कंपनीमध्ये रुजू करून घेताना कोण कोणते गुण आवश्यक असतात? याची माहिती दिली. तसेच भविष्यात अभियांत्रिकीत प्रवेश घ्यायचा झाला तर लागणाऱ्या आवश्यक बाबी, त्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक सुविधा, वसतिगृह व्यवस्था याबाबत आवश्यक माहिती दिली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांनी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देताना ‘ कॉम्प्युटिंग पॉवर, चेंज ऑफ टेक्नोलॉजी, डाटा फिकेशन, जिनोमिक्स, रोबोटिक्स, ब्लॉकचेन आदीं बाबत सांगून तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी करण्याचे आवाहन केले. यावेळी आलेले विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वेरीच्या सर्व विभागांना भेट देवून प्रदर्शनातील साहित्य साधनांची व तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन तीन दिवस अर्थात १६ सप्टेंबर पर्यंत चालणार असून यात उच्च शिक्षित प्राध्यापकांकडून मार्गदर्शन होणार आहे. स्वेरीतील शिस्तबद्ध विद्यार्थी, संशोधनासाठी उपयुक्त वातावरण आणि मिळणारे ज्ञान यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी प्रचंड उत्साहीत व प्रेरीत झाले. सलग तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिष्ठाता व विभागप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहेत. यावेळी विविध महाविद्यालयातून आलेले प्रा. उर्मिला भोसले, प्रा. प्रियांका चव्हाण, प्रा. संजय काटकर, प्रा. महांकाळ, प्रा. देशमुख, प्रा. शोभनतारा मेटकरी, प्रा. वायदंडे, आदी शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते.