ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
शिवसेना पक्षात पडलेल्या उभ्या फुटीचे तीव्र पडसाद महाराष्ट्र भर उमटले आहे. ईगतपुरी त्रंबकेश्वर तालुक्यातही खा.हेंमत गोडसे यांचे विश्वासु समर्थक तथा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. मेंगाळ हे ठाकूर समाजाचे दिग्गज नेते असुन या समाजावर त्यांची विशेष पकड आहे. हा समाज शिवसेनेच्या ठाकरे गटापासुन दुरावण्याची भीती व्यक्त होते आहे.यामुळे आगामी काळात शिवसेनेला याची मोठी झळ बसणार आहे अशी साधार चर्चा जोर पकडत आहे.
ईगतपुरी त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जेव्हा जेव्हा शिवसेनेने ठाकूर समाजाला या मतदारसंघात उमेदवारी बहाल केली तेव्हा तेव्हा शिवसेनेने येथे विधानसभा निवडणुक असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो बाजी मारल्याचे वास्तव आहे. माजी आमदार पांडुरंग गांगड व काशिनाथ मेंगाळ या तत्कालीन काळात नवख्या उमेदवारानीही केवळ समाजाच्या एकगठ्ठा मतपेटीच्या बळावर या मतदारसंघात विजय मिळवण्याचा चमत्कार घडवून आणला होता हा सर्वश्रुत इतिहास आहे. या समाजाने सातत्याने शिवसेनेची प्रामाणिक पणे पाठराखण केली.अर्थात शिवसेनेनेही आमदार, जि.प.सदस्य, सभापती, पं.स.सदस्य आदी पदे देत या समाजाला झुकते माप देत पुरेपूर परतफेड केली आहे.
शिवसेना स्थानिक पदाधिकारी व तत्कालीन आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यात तीव्र अंतर्गत मतभेद झाल्यावर मेंगाळ तथा ठाकूर समाजाला उमेदवारी देतानां शिवसेनेकडून डावलण्यात आले होते. याचा फटका शिवसेनेला जबर बसला. नाराज ठाकूर समाजाने शिवसेनेची संगत सोडल्याने सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याचा इतिहास आहे. यात अनुक्रमे माजी आमदार स्व.विठ्ठलराव घारे यांचे चिरंजीव स्व.रामदास घारे, माजी आमदार शिवराम झोले व सौ.निर्मला गावित यांचा समावेश आहे.या तीनही मातब्बर उमेदवाराचां अथक प्रयत्नानंतर ही पराभव झाला.
दरम्यान या समाजाची प्रामाणिक साथ असतानांही शिवसेना फुटीनंतर हा समाज शिवसेनेपासुन दुरावतो कि काय अशी भीती सेनेसमोर उभी ठाकली आहे.कारण काशिनाथ मेंगाळ हे या समाजाचे दिग्गज नेते असुन त्यांची पकड या समाजावर आहे. अर्थात ठाकूर समाजाचे अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेनेसह अन्य पक्षातही असले तरी मेंगाळ यांच्या इतके व्यापक नेतृत्व त्यांच्या कडे नाही. त्यामुळे मेंगाळ यांना किमान आज तरी पर्याय नाही हे नाकारता न येणारे सत्य आहे. त्यामुळे मेंगाळ यांच्या शिंदे गटात प्रवेशाने शिंदे गट चांगलाच प्रभावी बनला आहे. मेंगाळ यांची इतर समाजातही चांगलीच उठबस असल्याने त्यांना अन्य मतदाराचेंही समर्थन आहेच.याशिवाय ठराविक कंपुच्या पलीकडे स्थानिक शिवसेना नेतृत्व अन्यत्र सरकत नसल्याने नाराज अनेक शिवसैनिक ही मेंगाळाच्यां पाठिशी उभे राहिले तर नवल नको.
एकूणच मेंगाळाच्यां जाण्याने फारसा फरक पडलेला नाही असा दावा स्थानिक शिवसेना नेतृत्व भलेही करत असतील पण यापूर्वी जेव्हा मेंगाळानीं पक्ष सोडून मनसेत प्रवेश केला होता तेव्हा पासून शिवसेनेला लागलेली घरघर आजही कायम आहे हे सत्य नाकारता येणार नाही.
अर्थात यावेळी शिवसेनेकडे काँग्रेस मधून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार सौ.निर्मला गावित यांच्या रुपाने दमदार नेतृत्व सध्यातरी आहे, त्यामुळे शिवसेनेनेही मेंगाळानां फारसे गांभीर्याने घेतलेले नाही हे ही दिसून येते.अर्थात राजकारण हे बेरजेचे करावे याचे भान शिवसेनेने गमावले तर मग नुकसान शिवसेनेचे च होणार आहे.
दरम्यान वरिष्ठ पातळीवर शिंदे शिवसेना गट, भाजप व मनसे अशी युती झाल्यास हया युतीचे कडवे आव्हान विरोधकांसमोर उभे राहणार आहे हयात शंका नाही.
राज्यातील सदयस्थिती पाहता भाजप, शिंदे गट व मनसे यांची युती तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी आघाडी होण्याची दाट चिन्हे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वरीलप्रमाणे युती व आघाडीतच होण्याची शक्यता आहे. यात कोण बाजी मारते हे लवकरच दिसेल.
ही निवडणूक म्हंणजे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाणार आहे.
*सौ.गाविताचां मार्ग मोकळा ?* दरम्यान शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिंदे गटाचे बोट धरल्याने आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातुन माजी आमदार सौ.निर्मला गावित या एकमेव दिग्गज उमेदवार उरल्या आहेत. त्यामुळे मेंगाळाचें जाणे गाविताच्यां पथ्यावर पडल्याची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान दिवाळी सणा नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून आगामी काळात सर्वच दिग्गज नेत्याचीं कसोटी पणाला लागणार आहे.
शिंदे व भाजप युती निश्चित झाली आहे. फक्त या युतीत मनसे हा नवा भिडु येणार का ? हीच चर्चा असुन सातत्याने डावलण्यात येणाऱ्या काशिनाथ मेंगाळ यांना या निवडणुकीच्या माध्यमातून स्वतः चे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे हे मात्र निश्चित. त्यावरच त्यांचे पुढील राजकीय यशापयश अवलंबून आहे.