कारखान्याचा १९ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा दिमाखात संपन्न
मोहोळ प्रतिनिधी
मागील गाळप हंगामामध्ये लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे २१५० रुपये प्रतिटन दर दिला असून १ एप्रिल नंतर प्रोग्रॅमपेक्षा उशिरा गाळपास आलेल्या उसास प्रतिटन १५० रुपये प्रमाणे दर व कामगारांना तीन महिन्याचा पगार बोनस देणार असे प्रतिपादन लोकनेते सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले आहे.
अनगर(ता.मोहोळ) येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा २०२२-२३ चा १९ वा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा प्रांताधिकारी गजानन गुरव साहेब व त्यांच्या सौभाग्यवती या दांपत्याच्या शुभहस्ते संपन्न झाला. मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत (तात्या) माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की, कोणतेही कर्ज न घेता माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ १२५० प्रतिदिन मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना ५ हजार ५०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेपर्यंत कारखान्याचे विस्तारीकरणास शेतकरी, सभासद व कामगारांची मोलाचे योगदान आहे.
तसेच प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाले की, माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन बाळराजे पाटील यांच्या कार्यकुशल कर्तृत्वाने लोकनेते साखर कारखान्याची प्रगती दिसून येते. तसेच कारखाना कर्जमुक्त ठेवून सभासद, कामगारांच्या हितासाठी घेतलेले निर्णय वाखानण्याजोगे असल्याचेही गुरव यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार यशवंत माने यांनी सांगितले की, साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना अनेक बँकांच्या तसेच प्रमुख नेत्यांच्या दारात कर्जासाठी हेलपाटे मारताना पाहिले आहे, मात्र लोकनेते साखर कारखाना मात्र एकमेव असा साखर कारखाना आहे की, अनेक बँका कर्ज देण्यासाठी पाठीमागे असतात. तसेच माजी आमदार राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाने लोकनेते कारखान्याची यशस्वी घोडदौड करीत आहे. असे कौतुक या सोहळ्याचे अध्यक्ष आमदार यशवंत माने यांनी केले.
यावेळी मोहोळचे तहसीलदार मा. प्रशांत बेडसे-पाटील , मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, मोहोळचे गट विकास अधिकारी अनंतकुमार मिरगणे,नानासाहेब डोंगरे, देवानंद गुंड-पाटील, प्रकाश चवरे,दीपक माळी,अस्लम चौधरी,नानासाहेब डोंगरे,सज्जन पाटील,जालिंदर लांडे,हरिश्चंद्र आवताडे,सभापती रत्नमाला पोतदार, नागेश साठे,दत्ता पवार,शशिकांत पाटील,वैभव गुंड,रामदास चवरे, अनिल कादे,कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, मुख्य शेती अधिकारी एम.आय.देशमुख आदी मान्यवरांसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी सभासद बांधव व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.