पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुध्द एकादशी दि.25 जुलै 2025 रोजी असून, यात्रा कालवधी 15 ते 29 जुलै असा असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 18 ते 20 लाख भाविक पंढरपूरात येतात. या कालावधीत पंढरपूर शहरातील विविध भागातून भाविकांची रिक्षातून वाहतुक करण्यात येते. भाविकांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षांना आवर घालण्यासाठी 61 रिक्षांवर कारवाई करुन 4 लाख 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त तपासणी मोहिमेत कारवाई 115 रिक्षांची तपासणी केली. यामध्ये 61 रिक्षावर कार्यवाही करण्यात आली असून यापैकी 11 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. पंढरपूरात येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुरक्षित, सुलभ आणि सुविहित ठेवण्यासाठी तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक व निश्चित केलेल्या दरांपेक्षा भाविकांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाकडून पथके नेमण्यात आली आहेत. पंढरपूर शहर व परिसरात धावणाऱ्या ऑटो रिक्षांवर संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
रिक्षा चालकांवर वैध चालक परवाना व परमिट नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांनी वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि चालक परवाना सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच, निश्चित केलेले भाडेपत्रक प्रवाशांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावे असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक झगडे यांनी केले आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन अधिकारी स्वप्निल गिरी , मोटार वाहन निरीक्षक राजन सरदेसाई, श्रेयस सरागे, नितीन गायकवाड,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विक्रांत होनमोरे, प्रतीक्षा नारायणकर,भाग्यश्री रोडगे,कोमल डांगे, हनुमंत गेळे, सागर नलावडे तसेच पंढरपूर शहर पोलीस कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आली.

