पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ “फेअरवेल-2K26” शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, समन्वयक प्रा. सुमित इंगोले, डॉ. नामदेव सावंत तसेच ACSES अध्यक्ष कुलदीप गोडसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे आणि प्रा. नामदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले की, यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि सर्वोत्तम प्रयत्न आवश्यक असतात. युवावस्थेत घेतलेले निर्णय आयुष्याचा पाया घडवतात. जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतरच खऱ्या प्रवासाची सुरुवात होते. योग्य नियोजन, वेळेचा सदुपयोग आणि ठोस उद्दिष्टे निश्चित करून प्रामाणिकपणे व चिकाटीने मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते.
कार्यक्रमात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी व विभागासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वैष्णवी पडगळ हिला ‘सर्वोत्कृष्ट अंतिम वर्ष विद्यार्थिनी’ म्हणून गौरविण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विभागामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि कौशल्यांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या निरोप समारंभादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शन, प्रेम व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी कुलकर्णी व प्रिती चौगुले यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नामदेव सावंत यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा निरोप समारंभ अत्यंत यशस्वी व अविस्मरणीय ठरला.

