म्हसवड प्रतिनिधी विजय टाकणे तेज न्यूज
माण तालुक्यातील म्हसवड शहरालगच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भिषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले असुन सर्व जखमींना सातारा येथील डॉ. क्रांतिसिह रुग्णालयात म्हसवड पोलीसांनी पाठवले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सातारा ( कोडोली ) येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथुन पंढरपुरला आपल्या आल्टो या चारचाकी वाहनाने निघाले होते, त्यांचे वाहन सकाळी ९ नंतर म्हसवड येथुन पंढरपुरकडे निघाले असता पुढे असलेल्या धुळदेव गावच्या हद्दीत त्यांची आल्टो कार ही आली असता त्या ठिकाणी रस्ता उखडलेला असल्याने रस्त्याचा अंदाज आल्टो चालकास न आल्याने अचानक ब्रेक्स दाबल्याने आल्टो कार ने तीन ते चार पलट्या खाल्या यामुळे झालेल्या अपघातामुळे आल्टोमधील दोन जण जागेवर ठार झाले तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सदर अपघाताची खबर धुळदेव गावात समजताच अनेक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत म्हसवड पोलीसांना याबाबत कळवले, सदर अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अभिजीत भादुले, पो. ना. लुबाळ व पो. हवा. हांगे हे तात्काळ घटनास्थळावर पोहचले, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १०८ या रुग्णवाहिकेतुन सर्व जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणले त्याठिकाणी जखमींवर प्राथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सातारा येथील डॉ क्रांतिसिह रुग्णालयात पाठवले.
दरम्यान सदर अपघातामुळे धुळदेव ग्रामस्थ अधिक च आक्रामक झाले असुन या अपघातास प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, सातारा ते सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग असुन धुळदेव गावच्या हद्दीतच या रस्त्याचे काम गत ८ वर्षापासुन रस्ते विकास महामंडळाकडुन रखडवण्यात आले आहे.
सदरचे काम पुर्ण करावे यासाठी आजवर येथील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने करुन प्रशासनाला याचा जाब विचारला आहे, मात्र प्रशासनाने त्यांची फक्त बोळवणच केल्याने अपघातांची मालिका येथे आज ही सुरु असुन आजवर जवळपास २० जणांना याठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे, तर आजवर जवळपास ३०० हुन अधिक छोटे – मोठे अपघात याठिकाणी झाले असुन आणखी कितीजणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्तेकामी जाग येणार असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्री गोरे यांच्या मतदार संघातील हा रस्ता आहे.आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे याच रस्त्यावरून सोलापूर जिल्ह्यात येत जात आहेत.तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान लहान पुलाचे बांधकाम केले नाही. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील पुलाचे बांधकाम गेली अनेक वर्षे सुरू आहे.पण पूल मात्र चालू होत नाही.तरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या रस्त्या बाबत लक्ष देऊन हा प्रश्न तात्काळ सोडवावा.अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

.jpg)