संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
अहिंसा परमो धर्माची शिकवण देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती अकलूज व परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सकाळी ७ वाजता शिवापूर पेठ येथील विसाहुमड दिगंबर जैन मंदिरातून भगवान महावीरांच्या पालखीची परिसरातून शांतीसागर ढोल पथकासह सुवाद्य मिरवणुक काढण्यात आली.या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वच श्रावक, श्राविकांनी भगवान महावीरांचा जयघोष केला.
दुपारी मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीचा अभिषेक मंगेश गांधी व मयुरा गांधी यांच्या हस्ते झाला तर बाहुबली गांधी यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.सायंकाळी सुनील दोशी व परिवाराच्या वतीने भगवान महावीरांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला.अध्यक्ष इंद्रराज दोशी यांनी सर्वांचे स्वागत केले.यावेळी सर्वच महिला मंडळे व सामाजिक मंडळांनी दिवसभराच्या उपक्रमात सहभाग घेतला.
संग्रामनगर येथे ही सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला.सकाळी संग्रामनगर परिसरातून भगवान महावीरांची पालखी वाजत गाजत काढण्यात आली.भगवान महावीरांचा अभिषेक भरतेश उपाध्ये व सौ.सविता उपाध्ये यांच्या हस्ते झाला.दुपारी समाजाच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.सायंकाळी भगवान महावीरांच्या जन्म सोहळ्यात कविता मगदूम, सुवर्णा सावळे, सुनीता कवठे यांच्यासह समाजातील महिलांनी सहभाग घेतला.येथील सर्व समाज बांधवांनी सदरचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला.
सुभाष पंडीत यांनी धर्मप्रभावनेतून वातावरण मंत्रमुग्ध केले.भारत वर्ष दिगंबर जैन तिर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिहीर गांधी व सन्मती सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी येथे भेट देऊन भगवान महावीरांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

