भाजप नेत्यांना विरोधकांनी निवडणूक कार्यालयाच्या गेटवरच रोखलं; नेमकं काय घडलं ?
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. दुपारी ठरलेल्या वेळेनुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्याची वेळ संपल्याने कार्यालयाचे दार बंद केले. मात्र भाजप पदाधिकारी वेळेत न आल्याने मोठा वाद निर्माण झाला.
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर हे दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणी दाखल झाले. मात्र दुपारी तीन वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे अर्ज प्रक्रिया थांबवून दार बंद केले. त्यानंतर भाजप नेते कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यांना अडवले.
वेळ संपल्याने कोणालाही प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेत शिवसेना (शिंदे गट) नेते अमोल शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी भाजप नेत्यांचा जोरदार विरोध केला. यावेळी निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.गदारोळानंतर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला. आम्ही कोणतेही अर्ज भरण्यासाठी आलो नव्हतो, तर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या पोहोच पावत्या घेण्यासाठी आलो होतो, असे त्यांनी सांगितले. आमच्या सर्व उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म देण्यात आले असून, सर्व अर्ज नियमानुसार दाखल झाले आहेत, असा दावा त्यांनी केला. विरोधकांनी विनाकारण गोंधळ घातल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर सर्व पक्षांचे नेते एकत्र आले. शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत भाजप आमदार आणि शहर अध्यक्षांना कडाडून विरोध केला. अखेर या सर्व पक्षीय दबावामुळे भाजप नेत्यांना तेथून माघार घ्यावी लागली.

