सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे ! १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी मुंबई येथून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तेज न्यूजला दिली
यावेळी गोरे म्हणाले की,दोन्ही विमानसेवांचं बुकिंग २० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होणार असून मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार ही सेवा मिळणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद ! मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरु करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. ज्याला आता यश आले आहे. मुंबई आणि बंगलोर या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. असे हि गोरे म्हणाले.
‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल!
जयकुमार गोरे , पालकमंत्री सोलापूर जिल्हा

