सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच उजनी धरण 100% भरल्याने तसेच वीर धरणातून भीमा व सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले त्यामुळे दोन्हीही नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शेती पिकामध्ये पुराचे पाणी जाऊन झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 पासून सुरू करावेत, असे निर्देश कृषी विभाग व सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने अनेक लघु व मध्यम प्रकल्प भरलेले असून या प्रकल्पातूनही पाणी ओव्हर फ्लो झाल्याने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत. पंचनाम्यापासून एक ही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.