पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा शुद्ध एकादशी सोहळा ०६ जुलै रोजी संपन्न होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक पायी चालत येतात, या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर पालखीतळांवर तसेच पंढरपूर शहरात यात्रा काळात शौचालय सुविधांचा वापर वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे करता यावा, यासाठी सर्व शौचालय सुविधांच्या ठिकाणच्या गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सर्व शौचालयांचा भाविकांना पूर्णपणे वापर करण्यास मदत होणार आहे.
आषाढी यात्रा काळात सार्वजनिक स्वच्छता राखली जावी, वारकऱ्यांना शौचालयाची व्यवस्था व्हावी यासाठी शासनाने पालखी मार्गावर जागोजागी मोबाईल टॉयलेट्स, कायम स्वरूपी टॉयलेट्स उभी केलेली आहेत. विशेषता पालखी मार्गावर तसेच पालखीतळांवर भाविकांना मुबलक सुलभ शौचालयाची उपलब्धता व्हावी. तसेच शौचालया कडे जाणारे मार्ग सुस्थितीत असावेत यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.
या पथकात उपजिल्हाधिकारी अमोल भोसले हे पथक प्रमुख असून, त्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी राहणार आहेत. पायी पालखी सोहळ्यासोबत चालत येणाऱ्या वारकरी भाविकांना पुणे तसेच सातारा येथे सुलभ शौचालयबाबत काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या अडचणी पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर निर्माण होऊ नयेत. यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून. पालखी सोहळे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्या अगोदरच सुलभ शौचालयाबाबतची सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहे.
सदर पथकाचे प्रमुख व अधिकारी कर्मचारी आजच सातारा जिल्ह्याकडे रवाना झाले आहे .जेणेकरून पालखीसोहळे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारकरी भाविकांना याबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली