पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरवात झाली असून, वारकरी भाविकांनी मंदिर परिसरात व दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या यात्रेचा मुख्य सोहळा रविवार दि. 06 जुलै रोजी संपन्न होत आहे. त्यासाठी श्रींच्या पदस्पर्शदर्शनरांगेत व मुखदर्शनरांगेत बॅरीकेटींग करण्यात आलेले आहेत. तथापि, श्रींच्या मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे कार्तिकी यात्रेप्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन सरकता उड्डाणपुल उभारण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची मुखदर्शनरांग श्री संत तुकाराम भवनच्या पाठीमागून छत्रपती संभाजी चौक पर्यंत असते. तथापि, छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपुल नसल्याने दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यास तसेच प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच स्थानिक रहिवाशी व दुकानदारांच्या देखील तक्रारी प्राप्त होत होत्या.
सदरचा उड्डाणपुल 30 फुट लांबी व 10 फुट उंचीचा असून, यामधील 12 फुटाचा भाग सरकता असल्याने, एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणा-या रथांना कोणताही अडथळा होणार नाही, 10 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमीतकमी वेळेत पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे. सदर उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या योग्य व सक्षम असल्याबाबत यांत्रिकी कार्यशाळेचे प्रमाणपत्र देखील घेण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे श्रींची दर्शनरांग द्रुतगतीने चालून भाविकांना जलद व सुलभ मुखदर्शन होणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.