मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती वाढली आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानला मोठा दणका दिला. मात्र अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. पाकिस्तानच्या लाहोर शहराचं रक्षण करण्यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त करुन पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. अशातच आता जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता सर्व निमलष्करी दलाच्या तुकड्या तिकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या सर्व निमलष्करी दलांच्या तुकड्या जम्मू काश्मीरला पाठवणार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व निमलष्करी दलांच्या अतिरिक्त तुकड्या तिथे पाठवल्या जाणार आहेत.
यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या तुकड्या सुरक्षा आणि सीमेवर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहे.
पाकिस्तानचा हल्ला उधळून लावला
भारतातल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एक दोन नव्हे तर भारताच्या लष्कराच्या 15 ठिकाणांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. पण भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले आहेत. बुधवारी रात्री वायुदलाने पाकिस्तानातून येणारा हल्ला एस 400 या एअर डिफेन्स सिस्टीमने नेस्तनाबूत केला. एअर डिफेन्स सिस्टीम असलेल्या भारताच्या युनिटचं नाव सुदर्शन चक्र असं आहे. भारताने नेमकं सुदर्शन चक्र पाकिस्तानवर सोडत पाकिस्तानी हल्ला निष्प्रभ केला. ANI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. मात्र याबाबत अजून अधिकृत सरकारी घोषणा झालेली नाही. भारताच्या एस 400 या सिस्टीमने पाकिस्तानातून आलेली सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन उडवून लावले.
अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना
अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.