पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जैन धर्म आणि समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा बाबत आणि पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर आणि तालुका सकल जैन समाजाच्यावतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १६/०४/२०२५ रोजी विलेपार्ले, मुंबई येथील जैन मंदिर चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीर पद्धतीने आणि सर्व बाबी समजून न घेता अत्यंत क्रूर पद्धतीने बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) द्वारा जेसीबी च्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले. सदर मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ,पूजा साहित्याची विटंबना करण्यात आली तसेच मंदिरातील प्रतिष्ठित मूर्ती भंग करण्यात (तोडण्यात) आली.
प्रशासनाच्या या जुलमी कार्यामुळे देशातील समस्त जैन धर्मीय व सर्व शांतताप्रिय नागरिक अत्यंत आक्रोशीत झाले आहेत. सदरच्या झालेल्या घटनेस जे जे अधिकारी जबाबदार असतील त्यांची चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि सदर उध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निर्माण करण्यात यावे.तसेच गेल्या अनेक वर्षा पासून जैन धर्माच्या तीर्थ स्थळावर अतिक्रमण करणे ,यात्रेकरूंवर हल्ला करणे, जैन मुनी साध्वीं वर हल्ला करणे व जाणिवपूर्वक त्रास देणे असे प्रकार सुरु आहेत.या मागे कुणाचा कुटिल हेतू आहे त्याचा शोध घेणे आवश्यक आहे.
जैन समाज हा अल्पसंख्यांक असून अहिंसावादी व शांतताप्रिय असतांना सुद्धा काही राजकीय पक्षाचे प्रतिनीधी जैन धर्माबद्दल निंदनीय,आक्षेपार्ह भाषा वारंवार वापरतात त्यावर कठोर कार्यवाही करावी.
तसेच पहेलगाम जम्मू काश्मिर येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या निरपराध नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाच्यावतीने पावलं उचलली आहेतच तरीही अतिरेक्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली.
या मागण्यांचे निवेदन पंढरपूर तहसिलदार सचिन लंगुटे यांना सकल जैन समाजाच्या वतीने देण्यात आले.या मूक मोर्चासाठी पंढरपूर पोलिस प्रशासनाच्यावतीने सहकार्य लाभले.यावेळी पंढरपूर शहर , सरकोली, भाळवणी,देगाव,जैनवाडी,करकंब,मोडलिंब,कवठाळी, धोंडेवाडी या ठिकाणाहून समाजबांधव उपस्थित होते.