पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
राष्ट्रीय भूमी अभिलेख दिन सर्व नागरिकांसमवेत साजरा करावा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्याचे जमाबंदी आयुक्त यांचेकडे समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
१० एप्रिल हा दिवस "राष्ट्रीय भूमी अभिलेख दिन" म्हणून त्या विभागाच्या सर्व कार्यालयामध्ये फक्त मोजणीयंत्र व सामुग्रीचे पूजन करून कर्मचारी साजरा करतात.
शासनाचा भूमीअभिलेख (मोजणी) हा विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग असून सामान्य जनतेशी अत्यंत जवळचा व थेट संपर्क येणारा असा विभाग आहे. भूमापन करणे,भूमीअभिलेख (नकाशे)तयार करून ते जतन करणे, नवीन विकास प्रकल्पासाठी रेखांकन करणे इ. महत्त्वाचे कामकाज या विभागात चालते. संपूर्ण जमिनीची, भूभागाची अचूक मोजणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर आहे. प्रत्येक नागरिकाचा या विभागाबरोबर अनेक पिढ्यांचा संबंध येतो. घर असो वा प्लाॅट असो किंवा फ्लॅट असो सर्वांची क्षेत्रफळाची अचूक माहिती, नोंद या विभागाकडे असते.त्यामुळे प्रत्येक व्यक्ती या विभागाला जोडला गेला आहे. शेती,प्लॉट, फ्लॅट याची मोजणी करणे, वारसांची नावनोंदणी करणे, बदल करणे इ. महत्त्वाचे काम हे थेट जनतेशी निगडीत आहे. सध्या आधुनिकीकरणामुळे या विभागाच्या कामामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. तो बदल सर्व सामान्य नागरिकांना समजला पाहिजे,त्याची माहिती झाली पाहिजे. या विभागासंबंधी त्यांचे असलेले गैरसमज दूर झाले पाहिजेत त्यासाठी १० एप्रिल या भूमीअभिलेख दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात नागरिकांना, सामाजिक संघटनांना सहभागी करून थेट संवाद साधता येईल. त्यांच्या शंका,अडचणी जाणून घेता येतील, तसेच उपयुक्त सुचनाही समजतील.
त्यामुळे प्रशासन व जनता यांच्यात सुसंवाद वाढेल. यासाठी हा राष्ट्रीय भूमीअभिलेख दिनाच्या तालुका पातळीवरील समारंभात सामान्य नागरिकांना सहभागी करून घेऊन साजरा होईल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, प्रांत विधी आयाम प्रमुख श्रीकांत जोशी,सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा महिला प्रमुख सौ. माधुरी परदेशी यांनी व्यक्त केली आहे.