पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय डाक विभागाच्या वतीने दिनांक 14 सप्टेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील "ढाई आखर पत्र लेखन स्पर्धा" आयोजित केलेली होती. त्यासाठी "डिजिटल युगात पत्रलेखनाचा आनंद" या विषयावरती स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रलेखन करावयाचे होते.
या भारतीय डाक विभागाच्या ढाई आखर पत्र लेखन स्पर्धेच्या प्रवेशिका दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे झालेल्या भारतीय डाक विभागाच्या महापेक्स प्रदर्शनाच्या दरम्यान छत्रपती संभाजी नगर होऊन निघालेली "रायगड एक्सप्रेस" जीचे पंढरपूर विभागाने अतिशय थाटामाटात स्वागत केलेले होते. त्या रॅली दरम्यान या पत्रलेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांची पत्रे संकलित केलेली होती.
या स्पर्धेमध्ये पंढरपूर डाक विभागातून 1578 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. तसेच राज्यभरातून सुमारे 75000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.
सदरची स्पर्धा ही राष्ट्रीय पातळीवरची होती. त्यासाठी राज्य पातळीवरती सुद्धा पहिल्या क्रमांकाला 25 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 10 हजार रूपये आणि तिसऱ्या क्रमांकाला 5 हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आलेली होती.
या पत्रलेखन स्पर्धेमध्ये पंढरपूर येथील कु. रसिका बाळू शिंगाडे हिने राज्य पातळीवरील द्वितीय क्रमांकाचे रक्कम 10 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. पारितोषिकाचे व प्रमाणपत्राचे समारंभपूर्वक वितरण महाराष्ट्र व गोवा पोस्टल सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल मा. अमिताभ सिंग साहेब यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल कुमारी रसिका शिंगाडे हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच विशेष बाब म्हणजे कुमारी रसिकाचे वडील हे भारतीय डाक खात्याचे कर्मचारी आहेत. त्यामुळे भारतीय डाक खात्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबीयांना कुमार रसिकाचा अभिमान वाटावा अशा प्रकारचे यश असल्याने, सर्व पोस्टल कर्मचारी यांच्या वतीने पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक सी.बी. भोर यांनी सत्कार करून तीचे अभिनंदन केले.