कुस्ती आणि राजकारण...
तांबड्या मातीतील रांगडा आणि मस्तवाल खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिले जाते,कुस्ती चा इतिहास जरी पाहिला तर हा खेळ प्रामाणिक, जिगरबाज, विनम्र आणि खिलाडूवृत्ती असलेल्या मल्लांचा खेळ म्हणून ओळखला जायचा, एक काळ होता, कुस्ती च्या कोणत्याही तालमीत तेथील वस्तादाला अगदी देवाचं स्थान असायचं, वस्तादाच्या दर्शनाने सरावाची सुरुवात व्हायची, दिवसातून तीन ते चार वेळा वस्तादाचा आशीर्वाद घेतला जायचा, इतकेच नव्हे तर तालमीत पाहुणे जरी आले तर तिथे शिकायला असलेले मल्ल त्या पाहुण्यांच्या देखील पाया पडायचे, आपल्याला शिकवणाऱ्या सिनिअर पोरांच्या पाया पडायचे, त्यांचे पडेल ते काम करायचे,इतका सुसंस्कृत आणि सोज्वळपणा जपणारा हा खेळ, कुस्तीच्या मैदानात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला आलिंगन दिलं जायचं, कुस्ती हरलो किंवा जिंकलो तरीही खेळ भावना टिकवून ठेवण्यासाठी जिंकलेला पैलवान उन्माद न करता हरलेल्या पैलवानाला प्रेमाने मिठ्ठी मारायचा, हरलेले आणि जिंकलेले दोन्ही मल्ल पंचांच्या पाया पडायचे,दोन्ही कुस्तीगीरांच्या गुरूंचे दर्शन घेतले जायचे, इतकेच नव्हे तर पंच सोडून त्या कुस्तीच्या मैदानात इतर कोणीही लुडबुड करत नव्हते, मैदानात च नव्हे तर मैदानाबाहेर ही कोणी राजकीय व्यक्ती,उद्योजक,बुकी, सट्टेबाज यांचा वारा ही त्या मल्लांना लागायचा नाही, इतकी पारदर्शक, स्पष्ट आणि निर्मळ मनाने या मानाच्या स्पर्धा पार पडायच्या, खरंच तो मध्ययुगीन काळ कुस्ती या क्रीडाप्रकारासाठी सुवर्णकाळ होता, कुस्ती ही निरपेक्ष, निर्विवाद आणि निरामय वातावरणात पार पाडली जायची, आणि कुस्तीच्या या स्वतःला घालून घेतलेल्या नियमांमुळेच कुस्ती या क्रीडा प्रकाराला एक वेगळं वलय, वेगळं अस्तित्व आणि वेगळेच ग्लॅमर प्राप्त झालं होतं, कुस्तीतील प्रामाणिकपणा तसेच तितकाच रुबाबदार दिलदारपणा, कुस्तीच्या मैदानातील मल्लांची विनम्र वागणूक, एकमेकांना दिलेला मानसन्मान,रांगड्या भाषेतील कुस्तीच्या खेळाचे केलेलं समालोचन,जुन्या जाणत्या कुस्तीगीराना दिला जाणारा आदर सन्मान, मानपान हे सगळं कुस्तीच्या वैभवात चार चांद लावत होते आणि यामुळेच कुस्ती या खेळावर अखंड विश्वाची नजर पडली आणि तेव्हापासून च कुस्तीत कुस्ती होऊ लागली...
मागील दोन ते तीन वर्षांपासून कुस्तीच्या या रांगड्या क्रीडाप्रकाराचा रानबाजार झालेला आपण पाहतोय, कुस्तीमधील ग्लॅमर, उत्कंठा कमी झाल्याचे दिसून येताना आपण पाहतोय, याला कारण एकच ते म्हणजे कुस्तीमध्ये झालेला राजकारणाचा शिरकाव, पंचाची मुजोरी, वस्तादांच्या अतिमहत्वाकांक्षा, आणि थोडक्यात प्रसिद्ध होण्यासाठी मल्लांची चाललेली राजकीय डावपेचांचा खेळी....
पूर्वी कुस्तीला लोकाश्रय, राजाश्रय मिळाला होता, आता मात्र कुस्तीला सत्तेचा आश्रय मिळाला आहे, आपल्या मर्जीतील मल्ल, कुस्तीगीर कसा पुढं घेऊन जाता येईल,त्याला मानाच्या स्पर्धेत विजेता कसं करता येईल या कडे संबंध राजकीय नेत्यांचे मंत्री, संत्री आमदार खासदार यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी मग सुरू होतो पैशाचा किळसवाणा खेळ....
विरोधी मल्लाला नुरा करण्यापासून ते वस्ताद, पंच, संयोजन,आयोजन कमिटी मॅनेज करण्यापर्यंत सगळी सेटिंग लावली जाते,आणि अशामध्ये खऱ्या खुऱ्या लढवय्या कुस्तीगीराच्या अष्टपैलू खेळाची आत्महत्या होते, ज्याला राजकीय वरदहस्त नाही, जो फक्त आपल्या खेळाच्या जोरावर पुढं आला आहे अशा कुस्ती पटूंचा खेळ पहिल्या राऊंडलाच खल्लास होतो,आणि पुढे जातात ते पॉलिटिकल पावर, इकॉनॉमिकल अँड मॅनेजमेंट पावर असलेले मल्ल,जे कोणकोणत्या आणि कशा कशाच्या कुबड्या लावून आलेले असतात ते देव जाणे...
कुस्तीतील हा हीन आणि दिनवाना प्रकार आजकाल शेम्बड्या पोरांच्याही लक्षात यायला लागला आहे, यातून बऱ्याच राजकीय धेंडांचे पितळ उघडे पडू लागले आहे, मात्र आपल्या देशात पंचांना अनन्यसाधारण महत्व आहे, त्यांनी दिलेला निर्णय अंतिम मानण्याची प्रथा आहे, मग तो चुकीचा का असेना आणि नेमकं तेच घडतंय आजकाल, सर्रास पंच मॅनेज्ड असतात, चांगल्या अन खऱ्या खुऱ्या मर्दानी कुस्तीगीराच्या आयुष्याचे वाटोळे करून नको त्याला पुढे घेऊन जातात,इथपर्यंत पोहचण्यासाठी त्या प्रामाणिक पैलवांनाच्या वस्तादाने, आई वडिलांनी व स्वतः त्याने घेतलेल्या कष्ठाचे मोल ते त्यांना काय कळणार..??? रक्ताचे पाणी आणि हाडाची काडं करून संभाळलेली ही संपत्ती; डोळ्यासमोर उध्वस्त होताना पाहून त्या माय माऊलींचे काळीज होरपळून जात असेल की नाही.???
आणि मग त्यातीलच एखादा मल्ल विक्षिप्त होतो, वैफल्यग्रस्त होतो आणि मग मॅणेज्ड पंचांना लाथा बुक्क्याची गुरुदक्षिणा भेटते..
खरं तर कुस्तीपटूच्या अशा वागण्याचे मीच काय कोणीही समर्थन करत नाही,करणार ही नाही, मात्र जर असं वेळोवेळी घडत असेल तर अथक परिश्रम,जिद्द, चिकाटी आणि तांबड्या मातीची इमाने इतबारे सेवा करून या विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या मल्लांच्या मेहनतीचे, कष्ठाचे आणि स्वप्नाचे काय..???
आज टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेली असताना कुस्तीचे निर्णय, पंचांच्या विश्वासावर का दिले जातात..?? खरंच पंचांमध्ये कुस्ती या खेळविषयी प्रामाणिक भावना आहे का..??त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत असते का..??त्यांना बाह्य कमाईचे आमिष नाईल का..?? काहीही असो
कुस्ती मॅट वरील असो की मातीतील, तिसऱ्या, चौथ्या कॅमेरा पंचाची मदत का घेतली जात नाही..???
आज क्रिकेट, कब्बडी, खोखो सह ऍथलॅटिक्स मधील सर्व खेळात कॅमरा पंचाने एन्ट्री मारली असताना कुस्ती च्या बाबतीत अन्याय का..???
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाकी हजारो खेळ प्रकार सोडून फक्त कुस्तीमध्येच राजकीय हस्तक्षेप का..??
या राजकीय हस्तक्षेपाचे बळी आजपर्यंत कित्येक कुस्तीगीर झाले आहेत, खरंच या कुस्तीला राजकीय हस्तक्षेप आणि पंचांच्या अनागोंदी निर्णयाच्या अभिशापातून मुक्त केले तरंच हा मर्दानी खेळप्रकार जिवंत राहील अन्यथा लोकाश्रय, राजाश्रय आणि सत्ताश्रय मिळालेली सुप्रसिद्ध कुस्ती कुप्रसिद्ध होऊन आपणास शेवटच्या घटका मोजताना दिसेल...
धन्यवाद...
लेखन - समाधान गाजरे सर