पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सहित सप्तमी या दिवशी प्रतापगडावर १० नोव्हेंबर, १६५९ या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफझुलखानाचा कोथळा काढून त्याचा पुरता बीमोड केला. हे कार्य त्यांनी आपल्या मातोश्रींच्या म्हणजे पुण्यश्लोक आऊसाहेबांच्या आज्ञेनंच केलं. 'शहाजी राजे व बंधु संभाजी राजे याचे उसने फेडा' असे आऊसाहेब जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले होते. प्रतापगढला येताना अफझुलखानाने अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या पंढरीशाला उपद्रव पोहोचवण्याचा प्रयत्न केला, मंदिरात गायी कापल्या, माता-भगिनींना उपद्रव केला, त्याआधी श्रीतुळजाभवानीच्या मूर्तीचाही विध्वंस केला होताच. अशा क्रुरकर्म्या अफझुलखानाचा श्रीशिवप्रभुंनी केलेला वध तो दिवस म्हणजेच आई-वडिलांच्या आज्ञेची परिपूर्ती मातृ-पितृ इच्छापूर्ती दिन अर्थात शिवप्रताप दिन. हा दिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूरच्या वतीने साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त पंढरपुरातून सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवछत्रपतींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरून गीते म्हणत, घोषणा देत शिवप्रताप दौड काढण्यात आली. दौड झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसूर्यहृदय स्तोत्र या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्लोकांचे सामूहिक पठण झाले. त्यानंतर धारकरी तुकारामदादा चिंचणीकर यांचे मार्गदर्शन झाले. ध्येय्यमंत्र-प्रेरणामंत्र घेण्यात आला. शिवछत्रपतींची आरती करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली गेली. जिलेबीचा प्रसाद वाटप करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे रामकृष्ण वीर महाराज, जनता बँकेचे संचालक साळे सर, त्याच बरोबर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूरातील धारकरी, वारकरी, शिवभक्त, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.