मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
वयाच्या सतराव्या वर्षी, १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिक्षिका म्हणून नोकरीची संधी चालून आली. मी काही बीएड किंवा डीएड केलेले नाही परंतु केवळ माझ्या एका शिक्षकांच्या ' तू नक्की शिकवू शकशिल ' या दृढ विश्वासावर मी या नोकरीचा स्वीकार केला. माझं स्वतःचंही पदवी शिक्षण चालू होत. महाविद्यालयात तस पत्र देवून परवानगी घेतली होती त्यामुळे सकाळच्या वेळात स्वतःचे वर्ग झाल्यानंतर मी नोकरीला जावू लागले.
शिक्षक म्हटल्यावर डोळ्यासमोर शाळेचं एक ठराविक चित्र उभ रहात पण हि शाळा थोडी वेगळी होती. हि शाळा समाजातील अनाथ, निराधार आणि सामाजिक दृष्या दुर्बल घटकातील बालके व मुलींसाठी काम करते. महाराष्ट्र स्टेट वुमेन्स काऊन्सिल आशा सदन या बालगृहात इयत्ता ८ वी ते १० वी वर्गांना मी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली अभ्यासक्रमानुसार मी शिकवण्यास सुरुवात केली. खर तर हे एक आव्हानच होत. या मुली १५ ते १८ या वयोगटातील होत्या. कारण पारिवारिक किंवा सामाजिक समस्यांमुळे या मुली पूर्ण अशिक्षित अन्यथा २री,३री तून शाळा सोडलेल्यापैकी असतात. अर्थात त्यांना इतर वर्गाचेही शिक्षण येथे देण्यात येत होते.
समाज म्हणजे नक्की काय याची पूर्ण जाणीव झाली. पदवी शिक्षणा नंतर अनेक मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचीही संधी आली परंतु ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो त्याचे उतराई होण्याकरिता हीच नोकरी चालू ठेवण्याचे ठरविले. याचे श्रेय मी माझ्या आईला देईल कारण कुटुंबाच्या पडत्या काळात हीच नोकरी महत्त्वाची ठरली होती. वेतन कमी होते पण या बालकांचा आणि मुलींचा आशीर्वाद खूप मोलाचा ठरला. यानंतर मी कार्यालयीन व्यवस्थापनात सहायक म्हणून काम करू लागले. वेगवेगळ्या कामाची माहिती करून घेतली.खूप काही शिकायला मिळाले. यानंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहू लागले. नवनवीन आस्थापणांशी ओळखी झाल्या,संपर्क वाढले.काम करण्याची जिद्द आणि आवड वाढली होती. ज्या घटकांसाठी काम करत होते त्याच समाधान वाटत होत. हे सर्व करत असताना या क्षेत्राशी संबंधित सोशल वर्कर, ह्युमन राईट्स अँड पेरा लीगल आणि समुपदेशनाचे कोर्सेस ही मी पूर्ण केले. कोविड काळात न थांबता संस्थेसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू गोळा केल्या. त्याही काळात नोकरीवर जावून, संस्थेत राहून काम केले.
आज मी या संस्थेत उप अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. अनेक संपर्क वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या. त्या व्यवस्थितरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करतेय. आज या संस्थेत ११० मुले मुली आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाचा जोरावर आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना समर्थपणे सामोरं जाण्याची शक्ती मिळाली आहे.
३३ वर्षांच्या अविरत सेवे नंतर, या एकूण सामाजिक घटकांबाबत तयार झालेल्या मानसिकतेमुळे कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात आपणही काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून समाजासाठी काहीतरी करावं या विचार धारनेमुळे लवकरच १८ वर्षांवरील मुलींसाठी स्वतःच एक ग्रुप होम चालू करण्याचा मानस आहे आणि यासाठी मला माझ्या मुलाची मोलाची साथ लाभली आहे.