कार्तिकी यात्रा: भाविकांच्या सुविधेसाठी मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कार्तिकी यात्रा दिनांक 12 नोव्हेंबर रोजी असून. या यात्रेचा कालावधी दि.02 ते 15 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे श्रींच्या पदस्पर्श व मुखदर्शनरांगेत तात्पुरत्या स्वरूपात बॅरीकेटींग करून पत्राशेड उभारण्यात येत आहेत. यात्रेत प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन तसेच भाविकांच्या सुविधेसाठी प्रथमच मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल उभारण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची मुखदर्शनरांग श्री संत तुकाराम भवनच्या पाठीमागून छत्रपती संभाजी चौक पर्यंत असते. तथापि, छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपुल नसल्याने दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यास तसेच प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच स्थानिक रहिवाशी व दुकानदारांच्या देखील तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे श्रींच्या मुखदर्शनरांगेत सरकता उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय दि. 13 ऑक्टोंबर रोजी मंदिर समितीच्या सभेत घेण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व मंदिर समितीचे विभाग प्रमुख बलभीम पावले व स्थापत्य अभियंता भाऊसाहेब घोरपडे यांनी जलसंपदा (यांत्रिकी) विभाग, पंढरपूर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आवश्यक ते नियोजन करून अत्यंत कमी वेळेत 30 फुट व उंची 10 फुट लांबीचा सरकता उड्डाणपुल तयार करण्यात आला. यामधील 12 फुटाचा भाग सरकता असल्याने, एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणा-या रथांना कोणताही अडथळा होणार नाही, 10 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमीतकमी वेळेत पुलाचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे.
सदर ठिकाणी पूर्णवेळ तांत्रिक कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सदर उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या योग्य व सक्षम असल्याबाबत यांत्रिकी कार्यशाळेचे प्रमाणपत्र देखील घेण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे वर्षभरात होणाऱ्या माघी, चैत्री, आषाढी, कार्तिकी या महत्त्वाच्या व मुख्य यात्रांमध्ये श्रींची दर्शनरांग द्रुतगतीने चालून भाविकांना जलद व सुलभ मुखदर्शन होणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.