पळशी प्रतिनिधी तेज न्यूज
एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी, दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला संबंध भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या जोखडामध्ये अडकला होता. देशभर राष्ट्रभक्तीचे वारे वाहू लागले होते.बहुतांश युवक देश स्वतंत्र करण्यासाठी झगडत होते. महाराष्ट्र ही याला अपवाद नव्हता. पश्चिम महाराष्ट्र मधील मात्तबर नेत्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीर, देशभक्त उदयास आले. ज्यांनी देशासाठी आणि समाजासाठी योगदान दिले.त्या फळीतील व्यक्तिमत्वामध्ये मोहोळ तालुक्यातील अनगरचे बाबुराव अण्णा पाटील, गादेगावचे देशभक्त बाबुरावजी बागल,माजी आमदार कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील,स्व. यशवंत भाऊ पाटील, सुपलीचे नामदेव माळी, सोनकेचे निवृत्ती हाके,गार्डीचे दत्तात्रय फाटे, खिलारवाडीचे लक्ष्मण बागल उपरीचे पै.त्रिंबक नागणे,मेंढापूरचे पै.धोंडिबा गवळी,अशा अनेक महान व दिग्गज व्यक्तीचा नामोल्लेख करता येईल. याच जोडीदाराच्या फळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणजे पंढरपूर मधील पश्चिम परिसरात नावाजलेले चारित्र्यसंपन्न नावलौकिक असणारे हरिबा अप्पा जाधव यांचा जन्म १९२३ साली पळशी या गावी झाला.
प्रतिकूल परिस्थिती असल्याने अप्पाना शालेय शिक्षण घेता आले नाही. याची त्यांना जीवनभर खंत सलत राहिली. गरीब परिस्थितीशी झगडत असताना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले. त्यासाठी पारंपारिक पद्धतीचा उपयोग केला. त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी सुरुवातीला दुसऱ्याची शेती वाट्याने किंवा त्यास बटईने शेती करणे असे म्हणतात. मोट धरून, शेती करून कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या जोरावर प्रारंभी दोन एकर शेती घेतली. नंतर च्या काळात एक आदर्श उसाची शेती करून कष्ट व जिद्दीने जवळपास शंभर एकर शेती केली. शेतीसाठी चाळीसगाव पाचोरा या ठिकाणहून शेंगाची पेंड रेल्वे ने घेऊन आले. त्याच काळात त्यांनी १९५६ साली उसाच्या पिकावर अवलंबून असलेल गुऱ्हाळ उद्योग सुरु करून गरिबांना रोजगार उपलब्ध करून दिला.गुऱ्हाळात तयार झालेला गूळ पंढरपूरच्या बाजारपेठेत नेऊन अप्पा विकत असत. अप्पांच्या आधुनिक शेतीच्या पद्धतीने त्यांनी दोन किलोमीटर सिमेंटची पाईप लाईन करून एक नवोपक्रम केला होता.
अप्पा आपल्या शिवारात काम करणाऱ्या प्रत्येक मजुराची काळजी कुटुंबातील व्यक्तीसारखी घेत असत. शेती विकास कार्यक्रम शासन आज जो घेत आहे मला वाटत ते आप्पाची कॉपी करतात. कारण रोजगार हमी योजनेत जे बांध घालणे,चाऱ्या पाडणे, गठरे काढणे, पलांनी घालणे, मोटा चालविण्यासाठी पवळ घालून पाट तयार करणे हॆ सर्व उपक्रम अप्पा त्यावेळी करत होते. इतक्या दूरदृष्टीचा असणारा व्यक्ती महत्वाकांक्षी असणार यात शंकाच नाही. या त्यांच्या उपक्रमात ज्यांच्या नावाचा मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे धोंडिबा सोमा लोखंडे,सोपान भागोजी साठे,मल्हारी श्रीपती साठे, शंकर कृष्णा लोखंडे, भीमराव तुकाराम लोखंडे, नाना हरिबा लोखंडे, सुखदेव महादेव लोखंडे, भिकाजीं निवृत्ती लोखंडे, दाजी गेना नाईकनवरे आदिनी अप्पाना आपल्या धन्याच्या प्रपंच्यासाठी इमाने इतबारे कष्ट केले.
या व्यक्तिमत्वाची जडण घडण अनेक दोस्ताच्या सानिध्यात झालेली दिसून येते. अप्पाना लहानपणीच कुस्तीची फार आवड होती. गावगावच्या जत्रा व यात्रेतील कुस्त्यात निकाली कुस्त्या करण्यात अप्पा पटाईत होते.त्यांचेसोबत पांडुरंग बागल,आजोळ खिलारवाडीचे मामा संभाजी बागल, नामदेव बागल,झगडू झांबरे, सुखदेव जाधव,बाळासाहेब भुईटे, भीमराव झांबरे,चिंतु झांबरे, दत्तात्रय जाधव,औदुंबर झांबरे, मच्छिन्द्र पाटील,नामदेव चव्हाण, शंकर चव्हाण, मारुती चव्हाण यांच्या सहकार्याने गावगाडा सुव्यवस्थित हाकायचे. गावात शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी प्रयत्न केले. ग्रामपंचायत, सोसायटी बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.
कुळ कायद्याने मिळत असलेली शंभर एकर जमीन परत देऊन टाकली.१९७६ च्या दरम्यान त्यांनी आदर्श सोसायटी बिनविरोध करून चेअरमन झाले. गावात एक हरहुन्नरी व्यक्ती म्हणून नावलौकिक केला.शेतात वीस पंचवीस रोजगारी दररोज असायचे मोठमोठ्या कडब्याच्या गंजी, तीन बैलजोड्या असा खूप मोठा अवाढव्य प्रपंच उभा करून ठेवला होता.
अप्पांचा रुबाब हा आजच्या एखाद्या दाक्षिणत्य अभिनेत्याला लाजवेल असा होता. डोक्याला खागरी भरजरी,पायात कोल्हापुरी पायताण, पांढऱ शुभ्र धोतर, गुडघ्यापर्यंत तीन बटणी पांढरा रेशमी सदरा अप्पांचं व्यक्तिमत्व खुलून दिसायच. आपल्या सायकलला नेहमी फरशी कुऱ्हाड लटकावलेली असायची. अप्पांचा आपल्या कुटुंबावार फार जीव होता. त्यांचा एक भाऊ मुकुंदा तोही पैलवान नामवंत होता.अप्पांच्या या नेतृत्व गुणामुळे त्यांच्या मार्गदर्शन घेतलेले स्व. वसंतराव दादा काळे या नेतृत्वाचा विकास झालेला आहे.
आपल्याला शिक्षण घेता आलं नाही आणि मुलं शिकली नाहीत म्हणून त्यांनी आपल्या नातू डॉ. अजित नामदेव जाधव व डॉ. सुजित नामदेव जाधव यांना उच्च शिक्षण देऊन मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य डॉक्टर तयार करण्यात अप्पांची फार मोठी महत्वाकांक्षा होती.
आज अप्पा आपल्यात हयात नाहीत पण ते आज एका नावाजलेल्या सहकार शिरोमणी वसंतरावं काळे सा. कारखाना चे सुरुवातीपासून चे संचालक असलेले मा. गोरख भाऊ जाधव व नामदेव नाना जाधव यांचे वडील,शिक्षण महर्षी प्रा. सुखदेवराव चव्हाण सर यांचे मामा,पळशी गावचे मा. सरपंच मा. अर्जुन बापू जाधव यांचे आजोबा व डॉ. अजित व डॉ. सुजित यांचे ही आजोबा होते.अप्पानी आपल्या आपल्या तीस बत्तीस माणसांच्या एकत्रित कुटुंबातील नातू, पणतू यांना डॉक्टर, इंजिनियर व उच्च शिक्षण देण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
माणसांच्या जीवनात अनेक प्रसंग येत असतात त्यांना साथ देत त्यांच्याशी दोन हात करण्याची धमक ज्यांच्यात असतें ते कधीच काळासमोर नामोहरणं होतं नसतात. अशा सर्व गुण संपन्न अप्पा आपल्या चिरंतन स्मृतीना विनम्र अभिवादन. आपल्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना.
शोकाकुल.:
प्रा. अशोक सदाशिव लोखंडे पाटील
मा. अजितदादा पवार कनिष्ठ महाविद्यालय, पळशी.