यवतमाळ प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच नेत्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची यवतमाळमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. तसेच ‘उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या कोणत्याही फुकट गोष्टी मिळणार नाहीत’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“माझ्या राजकारणाला १९८९ साली सुरुवात झाली. १९९२ साली मी नागपूमध्ये एक मोठा मोर्चा काढला होता. १९९२ हा काळ सर्वांना खडबडून जागा करणारा होता. त्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा मी विदर्भात खूप वेळ असायचो. अमरावती, यवतमाळ इकडे मी फिरत असायचो. अमरावती तर माझं घर झालं होतं. सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी इकडे नवीन नाही. या ठिकाणचे सर्व विषय मला माहिती आहे. प्रश्न देखील माहिती आहेत. मात्र, मला वाईट हे वाटतं की अजूनही तेच प्रश्न आहेत. प्रश्न बदलले नाहीत”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.