सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
स्व. आबासाहेबांनी जाती - पातीचे राजकारण न करता सर्वसामान्य, कष्टकरी, उपेक्षित लोकांना बरोबर घेवून समाजकारण व राजकरण केले. त्यामुळे सांगोला तालुक्यातील सर्व जनताच स्व. आबासाहेब यांचे राजकीय वारसदार आहे. प्रेमाने माणसे जोडली जातात दादागिरीने नाही. ज्यांना सुख दुःखात सहभागी होण्यासाठी वेळ नसतो ते जनतेची सेवा काय करणार. विरोधकांना पराभव पुढे दिसतोय म्हणून त्यांना मोठ्या नेत्यांच्या सभा घ्याव्या लागतात. जनता आपल्यासोबत असताना स्टार प्रचारकाची काय गरज, असा टोला डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विरोधकांना लगावला.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटातील भाळवणी, केसकरवाडी, शेंडगेवाडी, खेडभाळवणी, शेळवे, भंडीशेगाव, उपरी, सुपली, पळशी, जैनवाडी, धोंडेवाडी याठिकाणी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. या प्रचारानिमित्त भाळवणी येथील शिवतीर्थावर डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी, स्व. आबासाहेब आणि विजयदादा यांनी नेहमी विकासाचे राजकरण केले. मोहिते पाटील कुटुंब नेहमीच काम करण्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. डॉ. बाबासाहेब यांनी लोकसभेला दिलेली साथ कधीही विसरणार नाही. ग्रामीण भागातील जनतेच्या विरोधात महायुती सरकार काम करत आहे. स्व. आबासाहेब यांच्या पश्चात उच्च शिक्षित असलेल्या डॉ. बाबासाहेब यांना एक संधी द्या ते नक्कीच तालुक्याला विकासाच्या उंच शिखरावर नेतील, असा विश्र्वास येथील मतदारांना दिला.
डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले की, सर्व जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. स्व. आबांनी शेतकऱ्यासाठी चळवळ उभी केली आहे. त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व जनशक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून तालुक्याच्या राजकारणाला एक सुसंस्कृत दिशा देण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांना विधानसभेसाठी संधी द्या.
डॉ. प्रभाकर माळी यांनी, ही निवडणूक एका विचाराची लढाई आहे, अविचाराची दृष्ट शक्ती पुढे उभा आहे. त्याला बळी पडता या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन केले. याप्रसंगी विजय शिंदे, दिनेश गवळी, गोरख लिंगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली सातपुते व इतर कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ. शीतलदेवी मोहिते - पाटील, सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, सांगोला बाजार समितीचे संचालक सुरेश माळी, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक गवळी, प्रताप म्हेत्रे, सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा वैशाली सातपुते, माजी सरपंच सौ. पूनम गवळी, केसकरवाडी सोसायटीचे माजी चेअरमन हणमंत केसकर, माजी सरपंच आप्पा मासाळ, विजय शिंदे, अमोल लिंगे, ग्रामपंचायत सदस्य विशाल म्हेत्रे, प्रवीण गायकवाड, मुसा शेख, शशिकांत विभुते, विष्णू मासाळ, होलार समाजाचे नेते संजय गोरवे, दिनेश गवळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, विनोद उबाळे, वसंत रूपनवर आदी परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.