मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्रिपद सोडणार का? देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सत्ता सोपवली जाणार की? की भाजप आपल्या पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार? की अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा महायुती आणि महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला नाही. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन मोठी खडाजंगी झाल्याचे दिसून आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे येण्यास उत्सुक होते. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण होणार? हे निवडणुकीनंतर जाहीर करणार असल्याची भूमिका घेतली होती.
फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही?
महायुतीमधून देखील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नव्हता. मात्र आता महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आग्रही असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार ठराव पास करुन याबाबत भूमिका घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. भाजपचे निरिक्षक दिल्लीतून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर यावर निर्णय होणार आहे. मात्र त्या आधीच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नावासंदर्भात आग्रही असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.