सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल वतीने मयूर पंख ऑक्टोबर सेवा सप्ताह निमित्ताने नीलकंठेश्वर प्रशालेमध्ये एक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माता सरस्वतीच्या पूजनाने मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष भास्कर आडकी ,मुख्याध्यापिका संगीता आडकी, पर्यवेक्षक ध्यावरकोंडा, लायन्स अध्यक्ष चक्रधर अन्नलदास ,लायन्स चंद्रकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लायन, कोषाध्यक्ष ,इतिहास अभ्यासक व व्याख्याते प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी,यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर विचारमंथन केले. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी महात्मा गांधींच्या जीवनातील प्रमुख टप्पे, त्यांच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका यावर सखोल विचार मांडले. त्यांनी गांधीजींच्या सादर केलेल्या सामाजिक सुधारणांवर, त्यांचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न, आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य याबद्दल सुद्धा उत्तम प्रकाश टाकला.त्यानंतर, लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे आणि देशसेवेच्या प्रती त्यांनी दाखवलेल्या समर्पणाचे वर्णन करताना प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी "जय जवान, जय किसान" या त्यांच्या घोषणेमागील भावना उलगडून सांगितल्या. लालबहादूर शास्त्रीजींच्या नेतृत्त्वात भारताने अन्नसंकट आणि युद्धाच्या कठीण काळातून कसा मार्ग काढला,याचीही माहिती उपस्थितां समोर मांडले . वर्तमानात जगण्याचे बळ मिळवण्यासाठी महापुरुषांचे कृतज्ञ स्मरण करायला हवे. जयंतीचेऔचित्य साधून माणसाने आपल्या मनातले विकारांचे तण उपटले आणि मनाच्या शेतीत उदात्त मूल्यांचे पेरणी केली तरच महापुरुषांच्या विचाराचे सच्चे अनुयायी निर्माण होतील असेही म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निळकंठेश्वर प्रशालेच्या शिक्षकांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.