महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचे माती, पाणी, भूमिपूजनासाठी नेणार
पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, शौर्य, कीर्ती जगमान्य आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आणि अखिल जपान भारतीय महासंघ आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्यो यांच्या सहकार्याने टोकियो शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. जानेवारी अखेरीस स्मारकाचे भूमिपूजन होणार असून मार्च पहिल्या आठवड्यात २०२५ रोजी उद्घाटन होणार आहे. अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शशिकांत कांबळे, समन्वयक, शिवाजी महाराज स्मारक,टोकीयो जपान,उत्तमराव मांढरेआम्ही पुणेकर संस्थचे विश्वस्त अखिल झांजले, ॲड. मिलिंद पवार, शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील ११ किल्ल्याना प्रास्ताविक नामांकन मिळालेले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि तामिळनाडू येथील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश आहे. याचा प्रसार करणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
हेमंत जाधव म्हणाले, मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने उभारण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे प्रेरणा देणारे स्मारक टोकियो येथे अभिमानाने उभा राहणार आहे.
भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील अकरा गड किल्ल्यांची माती आणि पाणी नेण्यात येणार आहे. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल आणि विराज करणार आहेत. खटावकर यांची तिसरी पिढी शिल्पाचे काम करणार आहेत. अखिल जपान भारतीय महासंघाचे अध्यक्ष आणि एदोगावा इंडिया कल्चर सेंटर, टोक्योचे संचालक योगेंद्र पुराणिक यांचे सहकार्य स्मारकासाठी मिळाले आहे.