पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव : निर्वासित
प्रकाशक : उषःकाल पब्लिकेशन
परिचय सावित्री जगदाळे
मूल्य :रु 4 ०० / -
डॉ. उषा रामवाणी - गायकवाड यांचे हे आत्मचरित्र . सुरवातीला वाचताना थोडं रटाळ वाटले . पण नंतर जसजसे वाचत गेले तसतसे हे वेगळेच कल्चर कळू लागले . सिंधी कुटूंबातील एक मुलगी आपली जात . रितीरिवाज , रूढीपरंपरा यांच्या विरुद्ध जाऊन पुरोगामित्वाची कास धरते तेव्हा तिला प्रत्येक गोष्टीत हजारप्रकारे संघर्ष करावा लागतो . सरकारी काम सहा महिने थांब ही मराठी म्हण आहे . या मुलीने सतरा वर्षे संघर्ष करून कुणाही गाइडच्या मदतीशिवाय २००६ साली ' एकोणिसाव्या शतकातील निबंध वाङमयातून व्यक्त होणारे स्त्री जीवन विषयक चिंतन ' या विषयात पीएचडी मिळवली . या प्रबंधाला प्रा. अ. का . प्रियोळकर हो उत्कृष्ट प्रबंधाचं पारितोषिक मिळाले . या यशाची दखल मराठीतील सर्व वर्तमानपत्रांनी तसंच 'ई ' मराठी (कलर्स मराठी ) सह्याद्री वाहिनीने घेतली . पण सतरा वर्षचा संघर्ष जबरदस्त होता . मुळात सिंधी समाजात शिक्षणाला फारसे महत्त्वच नाही . गरजेपुरतं शिकून मुलं पारंपारिक व्यवसायात पडत . मुलीही शिकायला फारशा उत्सुक नसत . पण उषा रामवाणी यांनी ज्ञानाचा ध्यास घेतला . शिक्षणाचा वसा घेतला . तो आतिशय खडतर पणे यशस्वी पुर्णत्वाला नेला . इथे सख्ख्या नातेवाईकानी विरोध केला मग बाहेरच्यांचे तर काही विचारायलाच नको . मग पैशासाठी तुटपुंज्या नोकर्या करणे आलेच . प्रकाशन संस्थेत काम कमी पगारात काम करूनही मनस्ताप सहन करावा लागणे . मग पैसे मिळतात म्हणून मृण्मयी दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला . पण सहा वर्षात फायदा नाहीच झाला . या धडपडीत अनेक मोठमोठी माणसे भेटली . त्यांचे स्वभाव कळाले . शिकायला मिळाले . या अनुभवाने पैसा नाही पण ज्ञानाने , जाणिवांनीसमृद्ध झाल्याचेच समाधान मिळाले लेखिलेला . या धडपडणाऱ्या , वाढत्या वयाच्या मुलीशी लग्न कोण करणार . सौंदर्य आणि पत्रिका जुळणे या दोन्ही गोष्टी पाहिल्या जात . एका मुलाने उंची कमी आहे म्हणून नकार दिला . तेव्हा लेखिकेला जाणवलं आपण कमी उंच आहोत . ज्ञानलालसेपायी आणि अनंत अडचणींना तोंड देत असताना स्वतःकडे बघायलाही वेळ नाही . आवडच नसल्यामुळे सवडही नाही .
आजच्या सुशिक्षित स्रीचे प्रश्न नि विशिष्ट समाजामुळे कुटुंबामुळे निर्माण झालेलं लेखिकेच्या प्रश्नांचं स्वरूप इतकं वेगळं आहे की हे प्रश्न सामाजिक असून ही पुर्णतः व्यक्तिगत , एकटीचे राहिले . उपेक्षित , अनधिकृत दुर्बल सामाजिक घटक असलेल्या सिंधी समाजातल्या स्त्रियांची कित्येक दाहक उदाहरणं समोर आहे त . अगदी लेखिकेच्या सख्ख्या बहिणींचीही ... शिक्षणापर्यंत फारशी मजल न गेलेल्या , स्वतंत्र विचार सरणीची कुवत नसलेल्या शेकडो मुली पुरुषसत्ताक मनोवृत्तीमध्ये खितपत पडल्या आहेत . चूल आणि मूल हीच गुणवत्ता सिंधी समाजातील मुलींवर लादली गेली आहे . स्त्रीकर्तृत्वच नाकारलं गेलंय अशा सिंधी समाजात ल्या भगिनींनी कसं आणि कशाच्या आधारावर पुढं यावं ? कसं जगावं? खूप शिका स्वतःच्या पायावर उभं राहा , कुठल्याही शोषणाला बळी पडू नका ' असा संदेश दुर्दैवाने मी माझ्या समाजभगीनींना देऊ शकत नाही . शिक्षणाचं महत्त्व मी त्यांना सांगू शकत नाही . माझ्याकडे आऊटपूट काय आहे ? एवढं शिकून सर्वस्व पणाला लावून मला काही मिळालं हे त्यांना कशाच्या आधारावर सांगू? माझ्या उदाहरणाने मी त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवू शकले? शिक्षणामुळे आपण आपल्या जातभगिनींनीसाठी काहीही करू शकत नाही . (अगदी स्वतः साठीही ) या अपराधी आणि कुरतडणाऱ्या जाणिवा मी उराशी बाळगून आहे . ' असं लेखिकेचं शल्य आहे . एकूणच एक विसाव्या शतकातील पाव शतक संपल्यानंतरचे हे आत्मकथन बरंच काही सांगून जाते . विचार करायला लावते अस्वस्थ करते . उषा रामवाणी - गायकवाड यांनी सिंधी समाजाचं आणि त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय ,सामाजिक , आर्थिक , अंगाने आपले चिंतन मांडले आहे . सर्वांनाच विचार करायला भाग पाडते .
शब्दकान सावित्री जगदाळे
सातारा