मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही अवघ्या महाराष्ट्राच्या मायभगिनींना एक नवी उमेद देणारी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसू लागला आहे. राज्यातील प्रत्येक भगिनीला तिच्या संसारात सुख समाधानासाठी महायुती सरकारतर्फे दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्यातील प्रत्येक पात्र माता भगिनींनी सहभागी व्हावे, यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे.
अर्थात सरकारला जनतेची साथ मिळत असताना ते न पाहवणारे आणि त्यामुळे उगाच विरोधाला विरोध करणारे राजकारणीही आले. अगोदर या योजनेसाठी पैसा नाही, मग ही तीन महिन्यापुरती योजना आहे. अशी सगळी कपोकल्पित राजकारणाची हाकाटी पिटवूनही जनतेने या योजनेला उदंड प्रतिसाद देत विरोधकांचा आवाज गप्प केला. त्यामुळे नाईलाजाने विरोधकांनाही लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारच्या सोबत यावे लागत आहे. मात्र दुसरीकडे सरकारला या योजनेचे श्रेय मिळू लागले आहे.