पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
यात्रेच्या कालावधीत बस स्थानकात मोबाईल टॉयलेट्स (फिरते स्वच्छता गृह) ठेवावीत अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांचेकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्याच्या विविध भागातून आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळे पंढरपूरसाठी निघालेले आहेत. त्या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी,भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या लवकर दर्शनासाठी पंढरपूर येथे येऊन पुन्हा आपआपल्या सोहळ्यात सामील होतात. त्यामुळे बसस्थानकात गर्दी वाढत आहे. राज्यातील २८ फलाट असलेले, सर्वात मोठे बस स्थानक म्हणून पंढरपूर बसस्थानकाची ओळख आहे मात्र तेथे असलेले सुलभ शौचालय फलाटापासून २००मीटर दूर अंतरावर असल्याने प्रवाशांकडून फलाटासमोरील मोकळ्या जागेचा वापर केला जातो.त्यामुळे सर्व परिसर अस्वच्छ होतो. त्यासाठी
शासनाच्या "निर्मल वारी" या संकल्पनेप्रमाणे वारकरी, भाविकांकडून संपूर्ण बसस्थानक परिसरात स्वच्छता राखता यावी म्हणून तेथे मोबाईल टॉयलेट्स (फिरते स्वच्छता गृह) ठेवणे आवश्यक आहे. तरी आठ दहा मोबाईल टॉयलेट्स व्हॅन तेथे ठेवाव्यात अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक न.प.व मुख्याधिकारी यांच्याकडेही प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा संघटक दीपक इरकल, सचिव सुहास निकते, तालुका संघटक महेश भोसले उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी पत्राद्वारे केली आहे.