माऊली हरित अभियानातंर्गत अजानवृक्ष, सुवर्णपिंपळ, नांद्रुक व शमी वृक्षांचे वाखरी विसावा येथे रोपण
पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरीची वारी म्हणजे तमाम महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचं श्रद्धास्थान. वारी एक परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली विठ्ठलभक्तीची दैदिप्यमान परंपरा पुढे चालू ठेवतात. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे बायोस्फिअर्स संस्था; जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर; पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने देववृक्ष सुवर्ण पिंपळ बीज प्रसादाचे प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी व उपस्थित भाविकांना वाटप करण्यात आले. ज्ञानवृक्ष अजानवृक्षाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जलार्पण करण्यात आले तसेच या दोन्ही वृक्षांबाबत सचित्र माहिती पत्रकांचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील हिरवाई वाढावी व त्यातून हरित उद्योजगता निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलेल्या बांबू स्वराज्य मोहिमेच्या बोधचिन्हाचे लोकार्पण देखील मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे, बायोस्फिअर्सचे अध्यक्ष-पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन अनिल पुणेकर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षयमहाराज भोसले; उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव; माऊली हरित अभियानाचे श्री. दत्तात्रय गायकवाड, श्री. शैलेंद्र पटेल, श्री. गिरीश गोखले, श्री. अभिजित भसाळे, श्री. अमरजीत जगताप, श्री. सिद्धार्थ घुले, श्री. आण्णा मारणे उपस्थित होते. तसेच देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील पालखी विसावा ठिकाणी अध्यात्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या देव-वृक्ष, ज्ञान-वृक्षांचे रोपण तसेच संस्कारित नक्षत्रवन-अध्यात्मिक वन निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून देववृक्षांचे (अजानवृक्ष, सुवर्णपिंपळ, नांद्रुक व शमी) प्रातिनिधिक व प्रतीकात्मक रोपण आषाढी वारी सोहळ्यात वाखरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज विसावा ठिकाणी पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री. सचिन इथापे यांच्या हस्ते, माऊली हरित अभियानाचे कार्यकर्ते व वारकऱ्यांच्या उपस्थितीत करून या विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाला पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय उपायुक्त श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल, विभागीय सहाय्यक आयुक्त श्रीमती पूनम मेहता, पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री. सचिन इथापे व गटविकास अधिकारी श्री. सुशील संसारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर उपक्रमात वाटलेले बीज हे आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. ते उपलब्धतेनुसार संकलित करून बीज प्रसाद म्हणून वाटत आहोत. जेणेकरून नागरिकांनी जास्तीत जास्त ठिकाणी या बीजापासून रोपांची निर्मिती करावी. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी येथे प्रवेश केल्यानंतर उजव्याबाजूला पुरातन काळापासून उभे असलेले पिंपळाचे (अश्वत्थ) झाड आहे त्याला “सुवर्ण पिंपळ” असे संबोधले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांनी या प्राचीन पिंपळास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या. सदर पिंपळाचे रोपण हे श्री कुबेराने केले आहे अशी एक जनमान्यता आहे. श्री ज्ञानोबाराय आणि या वृक्षाचे देखील एक अलौकिक नातं आहे. माऊलींच्या जन्मापासून ते संजीवन समाधी पर्यंतच्या प्रवासाचा हा वृक्ष साक्षीदार आहे. माऊलींनी समाधिस्त होण्याआधी सुवर्णपिंपळाच्या पायाशी मस्तक ठेवून नमन केले होते, त्याचा कृपाशीर्वाद घेतला होता. तसेच आळंदी येथील सिद्धबेट व संत ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीच्या सन्निध जो वृक्ष आहे तो अजानवृक्ष म्हणून ओळखला जातो. जो अत्यंत पूज्य आणि पवित्र आहे. जनमानसात त्याला आदराचे स्थान आहे. या वृक्षाला इतर नावाने देखील ओळखले जाते जसे की गोरक्षवल्ली, योगवल्ली, महावल्ली, गोरक्षगुल्म, योगिनी, शांभवी, अंजान वृक्ष, पूर्णधन, निधी, इ. असे हे भारत राष्ट्राचा वारसा असलेले वृक्ष त्याच्या अध्यात्मिक, पर्यावरणीय तसेच औषधी गुणधर्मांनी सुपरिचित आहे. या सिद्ध वृक्षाचे वर्णन आणि त्याची थोरवी आपल्या संतांनी सांगून ठेवली आहे. जसे की.
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ ।
अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥
- संत तुकाराम
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥
- संत नामदेव
अजान वृक्षाची पाने जाण ।
जो भक्षून करील अनुष्ठान ।
त्यासी साध्य होईल ज्ञान ।
येथे संशय नाही ॥
- संत एकनाथ महाराज
गोरक्षवल्ली सन्निध ।
पठणी पुण्य आघाध ।
सर्व सिद्धी होती साध्य ।
प्रत्यक्ष ते स्थळी ॥
- नाथयोगी आदिनाथ भैरव
बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री क्षेत्र आळंदी – सिद्धबेट येथील मूळ ज्ञानवृक्ष-अजानवृक्षाची रोपे आणि देववृक्ष सुवर्ण पिंपळाचे बीज व रोपे सर्वदूर पोहचवणे होय. एकुणातच काय या अध्यात्मिक, औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वारसा वृक्षांबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी, त्यांच्यात योग्यती सकारात्मकता यावी, देशातील-राज्यातील हिरवाई वाढावी, स्थानिक जैवविविधता वाढीस यावी, वारसा वृक्षाचे जतन – संवर्धन व्हावं, या उद्देशाने आपल्या संस्कृतीत, परंपरेत विशेष महत्व असलेल्या वृक्षांचे बीज व रोपे माऊली हरित अभियाना अंतर्गत सर्वदूर करत आहोत. आजपर्यंत या हरित अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे, गडकोट, मंदिरे, अध्यात्मिक-केंद्रे, संजीवन समाधी, विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या आवारात यांचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे. हे अभियान म्हणजे जणू अध्यात्म आणि विज्ञान यांची सुरेख सांगडच...! ह्या सिद्ध वृक्षाचा महिमा जाणता या प्रसंगी संत तुकोबारायांचा “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या अभंगाचे स्मरण आवर्जून होते.
सर्व सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक, व पर्यावरणीय पार्श्वभूमी लक्षात घेता या सर्व नमूद विषयक जागृत आणि संवेदनशील असलेल्या आपल्या वृत्तमाध्यमातून या अनोख्या उपक्रमांबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचता यावे या प्रामाणिक आणि नम्र विनंती करतो.
डॉ. सचिन अनिल पुणेकर पर्यावरण शास्त्रज्ञ आणि संस्थापक अध्यक्ष, (९५०३०९६४६९ / biospheresorg@gmail.com